Parbhani Reservation Rally: परभणीतील आंबेडकरवादी संघटनांनी अनुसूचित जातीच्या उपवर्गीयकरणाविरुद्ध मोर्चा सुरू केला. रिपब्लिकन सेनेच्या नेतृत्वाखाली, या धडकमोर्च्यात काठिवड्याला अभिवादन
परभणी (Parbhani Reservation Rally) : जातनिहाय जनगणनेचा वस्तुनिष्ठ डाटा उपलब्ध नसतांना आंबेडकरी समुहाला टार्गेट करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने अनुसूचित जाती उपवर्गीयकरणाचा निर्णय घेतला आहे. या उपवर्गीयकरणाला ५८ जातींचा प्रखर विरोध असुन राज्य शासन मनमानी करत आहे. या निर्णयाच्या विरोधात बुधवार १७ जून रोजी आंबेडकरवादी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
शनिवार बाजार मैदानापासून काढण्यात आलेल्या मोर्चाचे नेतृत्व रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले. क्रांतीचौक, गांधीपार्क, अष्टभूजादेवी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करुन आंदोलन मैदानावर मोर्चाचे सभेत रुपांतर करण्यात आले. यावेळी भदन्त डॉ.उपगुप्त महास्थवीर, भदन्त मुदीतानंद थेरो, भदन्त पंयावश, भदन्त मोग्गलायन, भदन्त संघमित्र, आदींसह (Parbhani Reservation Rally) आरक्षण उपवर्गीकरण विरोधी धडकमोर्चा समितीचे पदाधिकारी आणि अनुसूचित जातीतील ५८ जातींचे प्रमुख नेते उपस्थित होते. प्रारंभी विश्वजीत वाघमारे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांनी न्या.बदर समिती अहवाल रद्द करा, पदोन्नतीतील आरक्षण मिळालेच पाहिजे, खासगी क्षेत्रात आरक्षण सूत्र लागु करा, शहिद सोमनाथ सुर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार पोनि. अशोक घोरबांड व इतर दोषी पोलिस अधिकारी, कर्मचार्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, या सह आंबेडकरी समाजाच्या महत्वपुर्ण मागण्या करण्यात आल्या. निवेदन जिल्हा प्रशासनास सादर केले.

मनुवाद्यांचे षडयंत्र लक्षात घ्या - आनंदराज आंबेडकर
मातंग समाजात वाईट नाहीये , ते आपले भाऊच आहेत.५८ जात समुहाचे म्हणणे आम्हाला हे उपवर्गीकरण नको. पण सरकार मुद्दाम दोन जातीमध्ये तेढ करू पाहत आहे. कारण त्यांना इतर समाजामध्ये इंटरेस्ट नाही पण बौध्द समाज ज्या पद्धतीने प्रगती करतोय, ते अनेकांना सहन होत नाही. मनुवादी सरकार जाणिवपुर्वक उपवर्गीयकरणाचा निर्णय घेत आहे. ते त्यांनाही माहित आहे की, न्यायालयात टिकणार नाही. केवळ मातंग समाजाला राज्य सरकार तुमच्यासोबत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.
मात्र मातंग समाजाने हे षडयंत्र लक्षात घेतले पाहिजे. उपवर्गीकरणाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. ते वेळीच लक्षात घेतले पाहिजे. मागच्या सर्व पिढ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून लढले. आज त्याचा परिणाम म्हणून आपल्या सर्वांना आरक्षण मिळालं, आज आपण स्वाभिमानाने जगतोय, पुढच्या पिढीचा विचार करुन सर्व अनुसूचित जातींनी हा निर्णय हाणून पाडला पाहिजे, असे प्रतिपादन सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केले. ३० जून रोजी मुंबईत होणार्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.