जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेल आणि स्थानिक पोलीस ठाण्यांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे.
हरवलेले मोबाईल मिळताच अनेकांच्या चेहऱ्यावर समाधान
हिंगोली (Lost Mobile Phones) : जिल्हा पोलीस दलाच्या सायबर सेल आणि स्थानिक पोलीस ठाण्यांनी अत्यंत कौतुकास्पद कामगिरी केली आहे. जिल्ह्यातून तसेच इतर राज्य आणि जिल्ह्यांतून गहाळ झालेले एकूण ६० अँड्रॉइड मोबाईल फोन शोधण्यात पोलिसांना यश आले असून, हे सर्व मोबाईल त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत.
हस्तगत करण्यात आलेल्या या मोबाईलची एकूण किंमत सुमारे १० लाख रुपये आहे. हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या हस्ते आयोजित विशेष कार्यक्रमात हे मोबाईल त्यांच्या मूळ मालकांच्या स्वाधीन करण्यात आले. आपले हरवलेले मोबाईल पुन्हा हातात मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी मोबाईल रिकव्हर करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सायबर सेल व जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी तांत्रिक तपासाच्या आधारे शोधमोहीम सुरू केली. अत्यंत चिकाटीने तपास करत हिंगोली जिल्हा, शेजारील जिल्हे तसेच परराज्यांतून ६० महागडे अँड्रॉइड मोबाईल शोधून काढण्यात आले.
यावेळी हिंगोली पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दोन महत्त्वाचे आवाहन केले. कोणत्याही नागरिकाने अधिकृत पावती किंवा बिलाशिवाय जुने (सेकंड हँड) मोबाईल फोन खरेदी करू नयेत किंवा वापरू नयेत. तसेच मोबाईल फोन गहाळ झाल्यास किंवा हरवल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी किंवा केंद्र सरकारच्या अधिकृत CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर माहिती भरावी, जेणेकरून मोबाईलचा गैरवापर रोखता येईल.
या पथकाने बजावली महत्त्वाची भूमिका
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन आणि अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे, कुंदनकुमार वाघमारे आणि मोहन भोसले तसेच पोलीस निरीक्षक संदीप मोदे, गणेश गहीर, शामकुमार डोंगरे, सुधीर वाघ, संग्राम जाधव, विकास आडे, सोमनाथ भार्गे आणि सायबर सेलचे पोलीस अंमलदार दत्त नागरे, इरफान पठाण, मारोती काकडे, गणेश लेकुळे, प्रदीप डोंगरे व प्रणिता मोरे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली.