Latur Corporator Case: लातूर येथील एका घरमालक प्रमोद देशमुखने मिस्टर अंकित नंदकिशोरला भाडेत घेतलेल्या फ्लॅटच्या ताब्याची खटला समजून न्यायालयात धाव घेतली.
पोलीस बंदोबस्तात भाडेकरूने घर केले खाली!
लातूर (Latur Corporator Case) : लातूर येथील प्रमोद देशमुख यांनी स्वत:च्या मालकीचा फ्लॅट मिस्टर नगरसेवक अंकित नंदकिशोर बाहेती यांना कराराने भाडेतत्वावर दिलेला होता. मात्र घरभाडे थकविल्याने घर खाली करण्यास सांगूनही बाहेती यांनी घराचा ताबा सोडला नव्हता. या प्रकरणी घरमालक प्रमोद देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली होती. याप्रकरणी न्यायालयाने प्रमोद देशमुख यांच्या बाजूने निवाडा करत मिस्टर नगरसेवकाला घराचा ताबा सोडण्याचे निर्देश दिले होते. त्या निर्देशानुसार मिस्टर नगरसेवक अंकित बाहेती यांनी आपला ताबा सोडत पोलीस बंदोबस्तात त्यांनी घरातील सामान हलवावे लागले आहे.
प्रभाग १६ मध्ये असलेल्या एका इमारतीत प्रमोद चंद्रसेन देशमुख यांचा स्वत:च्या मालकीचा फ्लॅट होता. सदर फ्लॅट मिस्टर नगरसेवक अंकित बाहेती यांनी भाडेतत्वावर घेतलेला होता. सुरुवातीला काही महिने वेळेवर घरभाडे दिले. मात्र त्यानंतर घरभाडे देण्यास टाळाटाळ करून घराचा ताबा सोडण्याची कोणतीच तयारी त्यांनी दाखविली नाही. यामुळे मनस्ताप झालेले घरमालक प्रमोद देशमुख यांनी छत्रपती संभाजीनगर विभागाच्या भाडे नियंत्रण कायदा न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी घरमालक प्रमोद देशमुख यांना न्यायालयाने दिलासा देत सदर घर तात्काळ खाली करण्याचे निर्देश देवून दंडासहीत थकीत भाडे देण्याचे आदेशित केले. तसेच सदर घर पोलीस बंदोबस्तात खाली करून घ्यावे, असेही निर्देश न्यायालयाने दिले होते.
याप्रकरणी घरमालक प्रमोद देशमुख यांनी पोलीस बंदोबस्त घेवून आपल्या मालकीच्या घराचा ताबा मिळविण्यासाठी कारवाई केली. या कारवाईत मिस्टर नगरसेवक अंकित बाहेती यांनी पोलीस बंदोबस्तामुळे आपल्या घरातील सामान हलवत घराचा ताबा सोडला.
अखेर सत्याचा विजय झाला...
याबाबत प्रतिक्रिया देताना घरमालक प्रमोद देशमुख यांनी सांगितले की, अखेर सत्त्याचा विजय झालेला असून मला न्याय मिळाला आहे. लोकप्रतिनिधी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी अशा प्रकारचे वर्तन करणे योग्य नसून या लोकप्रतिनिधींकडून सर्वसामान्यांनी काय अपेक्षा करावी, असा सवाल केला.
हे राजकीय षडयंत्र...
घरमालक प्रमोद देशमुख यांना हाताशी धरून केवळ राजकीय हेतूने या प्रकरणात राजकीय विरोधक आपल्या बदनामीचा प्रयत्न करत आहेत. हे राजकीय षडयंत्र आहे, इतर दुसरे काहीच नाही, अशी प्रतिक्रिया अंकित बाहेती यांनी 'देशोन्नती'शी बोलताना दिली.