खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने हिंगोली येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
हिंगोली (Krantikari Shetkari Sanghatana) : खरीप हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने हिंगोली येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांची भेट घेतली. संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कच्छवे यांना निवेदन सादर करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.
निवेदनात खरीप हंगामासाठी डीएपी खताच्या तुटवड्याचा मुद्दा प्राधान्याने मांडण्यात आला. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वेळेत डीएपी खत उपलब्ध व्हावे यासाठी बफर स्टॉक तात्काळ खुला करण्यात यावा, अशी ठाम मागणी संघटनेने केली. तसेच भिजलेले अथवा निकृष्ट दर्जाचे खत शेतकऱ्यांना देण्यात येऊ नये, यासाठी कृषी विभागाने विशेष दक्षता घ्यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी पीक विम्याचा प्रश्नही ऐरणीवर आणण्यात आला. सन २०२४-२५ हंगामातील अनेक शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम अद्याप प्रलंबित असून, संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात थकीत विमा रक्कम तातडीने जमा करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली.
याशिवाय जिल्ह्यात बोगस जैविक औषधे, खते आणि बियाण्यांचा वाढता सुळसुळाट होत असल्याकडेही कृषी विभागाचे लक्ष वेधण्यात आले. या बोगस निविष्ठांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने जिल्हाभर विशेष तपासणी मोहीम राबवून दोषी उत्पादक, विक्रेते आणि संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करावी तसेच त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र व लक्षवेधी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सेनगाव तालुकाध्यक्ष प्रवीण मते, अमोल एकशिंगे आणि पवन मोरे उपस्थित होते.