Krantikari Shetkari Sanghatana: हिंगोलीत डीएपी खताच्या तीव्र तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल; क्रांतिकारी शेतकरी संघटनेने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्यांना निवेदन दिले.
हिंगोली (Krantikari Shetkari Sanghatana) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात निर्माण झालेल्या डीएपी खताच्या तीव्र तुटवड्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्यांनी सोमवारी १२ मे रोजी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, हिंगोली येथे ठिय्या मांडत निवेदन दिले.
निवेदनात संघटनेने म्हटले आहे की, पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरू असताना अनेक कृषी केंद्रांवर डीएपी खत उपलब्ध नाही. काही ठिकाणी कृत्रिम तुटवडा निर्माण करून खत साठवून ठेवले जात असल्याच्या तक्रारी शेतकर्यांकडून येत आहेत. त्यामुळे शेतकर्यांना दिवसभर कृषी केंद्रांचे चकरा माराव्या लागत असून आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने यामध्ये तात्काळ लक्ष घालून जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रांवर पुरेशा प्रमाणात डीएपी खत उपलब्ध करून द्यावे व साठेबाजी करणार्या व्यापार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी प्रमुख मागणी संघटनेने केली. तसेच उद्याही जिल्ह्यातील (Krantikari Shetkari Sanghatana) शेतकर्यांना डीएपी खत उपलब्ध झाले नाही आणि काही व्यापार्यांनी खताचा साठा करून ठेवला असल्याचे आढळून आले, तर क्रांतिकारी शेतकरी संघटना संबंधित कृषी केंद्रावर जाऊन शेतकर्यांना डीएपी खत वाटप करण्याचा निर्णय घेईल, असा इशाराही संघटनेने प्रशासनाला दिला आहे.
याशिवाय जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंगल सुपर फॉस्फेट तसेच जिप्समच्या नावावर बोगस खतांची विक्री चालू आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बोगस बियाणे आले असून यावर अद्यापही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही, याकडेही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले. या सर्व प्रकारांवर तात्काळ योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती संघटनेने केली आहे. हे निवेदन क्रांतिकारी शेतकरी संघटना, जिल्हा हिंगोली यांच्यातर्फे देण्यात आले. यावेळी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन प्रकाश कावरखे, नामदेव ल. घुले, सचिन रा. मते, विठ्ठल वामुधोरे व सुनील पाटील हे पदाधिकारी उपस्थित होते.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे (Krantikari Shetkari Sanghatana) संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हितासाठी हा लढा सुरू आहे. निवेदनानंतर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रदिप कच्छवे यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले. यावेळी कृषि अधिकारी वायसे, गुणनियंत्रक काळे यांच्यासह पोलिस कर्मचार्यांची उपस्थिती होती.