कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कथित वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप समोर आला .
कोटगुल प्राथमिक आरोग्य केंद्राविरोधात गंभीर आरोप; ४ ऑगस्टपर्यंत आर्थिक मदत न दिल्यास शाळेला कुलूप ठोकण्याचा इशारा
कोरची : कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय निष्काळजीपणामुळे एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणातील संबंधित डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करून मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तालुका अध्यक्ष अनिल केरामी यांनी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोटगुल येथील रहिवासी असलेली विद्यार्थिनी संजना जाळे हिला तापाची तक्रार असल्याने कोटगुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर ती P.V. Positive (मलेरिया) असल्याचे निदान झाले. मात्र, योग्य वेळी उपचार आणि रेफरल न दिल्यामुळे तिची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच विद्यार्थिनीचे हिमोग्लोबिन ३.४ इतके अत्यंत कमी असतानाही तिला तातडीची वैद्यकीय मदत तसेच उच्चस्तरीय उपचारासाठी वेळेत हलविण्यात आले नाही. याच निष्काळजीपणामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
या प्रकरणात OPD रजिस्टरमध्ये फेरफार झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला आहे. विशेषतः १८ जुलै रोजीच्या नोंदींमध्ये विसंगती असल्याचा दावा करण्यात आला असून संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संबंधित डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५, १०६ आणि २३८ अंतर्गत गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता शासनाने किमान १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. तसेच ४ ऑगस्टपर्यंत आर्थिक मदत न दिल्यास संबंधित शाळेला कुलूप ठोकण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या प्रकरणामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेतील कथित हलगर्जीपणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासन याबाबत काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री अशोक ऊईके, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यपालन अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.