Poet Azim Nawaz Rahi: प्रख्यात मराठी कवी अजीम नवाज राही यांना कोल्हापूरमध्ये 'रत्नाकर उत्कृष्ट काव्यपुरस्कार' देण्यात येणार आहे.
कवी अजीम नवाज राही यांचा कोल्हापूरात होणार सन्मान!
बुलढाणा (Poet Azim Nawaz Rahi) : प्रख्यात मराठी कवी, वक्ते व निवेदक अजीम नवाज राही (Poet Azim Nawaz Rahi) यांच्या ‘वळीवाच्या वेळा’ या कवितासंग्रहास दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूरचा यंदाचा ‘रत्नाकर उत्कृष्ट काव्यपुरस्कार’ जाहीर झाला आहे. या पुरस्कारात १० हजार रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे स्वरूप असून, २४ मे रोजी कोल्हापूर येथे आयोजित सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
अथर्व पब्लिकेशन, जळगाव प्रकाशित ‘वळीवाच्या वेळा’ हा कवितासंग्रह समकालीन समाजमनाचे संवेदनशील प्रतिबिंब मानला जातो. धर्म, जात, पंथ यांच्या पलीकडे जाऊन माणुसकीची निखळ जाणीव जपणारी ही कविता वास्तवाशी थेट संवाद साधते. मातीचा सुगंध लाभलेली भाषाशैली, प्रतिमांची समृद्धता आणि सर्वसामान्यांच्या वेदनांना स्पर्श करणारी आशयघनता हे राही यांच्या कवितेचे वैशिष्ट्य मानले जाते.
‘व्यवहाराचा काळा घोडा’, ‘कल्लोळातला एकांत’, ‘वर्तमानाचा वतनदार’, ‘तळमळीचा तळ’ यांसह अनेक गाजलेल्या कवितासंग्रहांचे ते लेखक असून, महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य पुरस्कार, कवी केशवसुत पुरस्कार, नारायण सुर्वे पुरस्कार आदी प्रतिष्ठेचे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितांचा समावेश आहे.