Breaking News
  • Pune: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज पुणे दौऱ्यावर
  • Gadchiroli: कौशल्याच्या जोरावर गडचिरोलीच्या तरुणांनी रोजगाराच्या संधी साधाव्यात – खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
  • Raigad - माणगावमधील JTL कंपनीमधील कामागारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक
  • Nagpur: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज राजस्थानच्या दौऱ्यावर
  • Nagpur: ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेचा निकाल सहा महिन्यांपासून रखडला
  • Nashik: त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी
  • नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी
  • खालापुर तालुक्यातील तुकसई गावचा पुल धोकादायक बनला
  • पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून खड्ड्यांच्या विरोधात आंदोलन

होम > आपले शहर

Ketan Agrawal Murder Case

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आईची पंतप्रधान मोदींकडे न्यायाची आर्त मागणी; ई-मेलमधून कठोर कारवाईची विनंती

तरुण व्यावसायिक केतन अग्रवालच्या हत्येनंतर न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्याच्या आईने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे.


केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आईची पंतप्रधान मोदींकडे न्यायाची आर्त मागणी ई-मेलमधून कठोर कारवाईची विनंती

Ketan Agrawal Murder Case |

मुलाच्या हत्येनंतर आजोबांचाही मृत्यू; तपास आणि खटल्यात विलंब न करता दोषींना कठोर शिक्षा देण्याची राखी अग्रवाल यांची मागणी

पुणे : तरुण व्यावसायिक केतन अग्रवालच्या हत्येनंतर न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या त्याच्या आईने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. केतनची आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधानांना भावनिक ई-मेल पाठवून हत्या प्रकरणाचा निष्पक्ष आणि वेगवान तपास करण्यासह दोषींवर कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे.

मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबावर ओढवलेल्या दुःखाचे वर्णन करताना राखी अग्रवाल यांनी ई-मेलमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या मुलाला न्याय मिळावा म्हणून देशाच्या पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची वेळ आयुष्यात येईल, अशी कल्पनाही कधी केली नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे. प्रत्येक आईप्रमाणे आपल्या मुलाचे लग्न, त्याचा संसार आणि आनंदी भविष्य पाहण्याचे त्यांचे स्वप्न होते. मात्र, स्वतःच्या मुलावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याची वेदना आयुष्यभर विसरता येणार नसल्याचे त्यांनी नमूद केले.

केतनच्या आठवणींनी घरातील प्रत्येक क्षण अस्वस्थ

केतनच्या हत्येनंतर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचे राखी अग्रवाल यांनी म्हटले आहे. घरातील त्याची खोली, कपडे, छायाचित्रे आणि प्रत्येक कोपरा त्याच्या आठवणी जागवतो. मुलाच्या निधनाच्या धक्क्यातून कुटुंब अद्याप बाहेर पडू शकलेले नाही.

काही दिवसांत कुटुंबाने गमावल्या दोन पिढ्या

केतनच्या मृत्यूचा मोठा धक्का त्याच्या आजोबांनाही बसला. हा आघात सहन न झाल्याने काही दिवसांतच त्यांचेही निधन झाले. त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत कुटुंबाने दोन पिढ्या गमावल्याची वेदना राखी अग्रवाल यांनी आपल्या ई-मेलमध्ये मांडली आहे.

सहानुभूतीची नाही, निष्पक्ष न्यायाची मागणी

पंतप्रधानांकडे कोणतीही विशेष कृपा किंवा सहानुभूती मागत नसून केवळ निष्पक्ष आणि जलद न्याय हवा असल्याचे राखी अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. केतन हा कुणाचा तरी मुलगा, भाऊ आणि नातू होता; मात्र कुटुंबासाठी तोच त्यांचे संपूर्ण जग होता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हे हत्या प्रकरण केवळ पोलिसांच्या दप्तरी एक फाईल बनून राहू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. दररोज केतनच्या छायाचित्राकडे पाहताना एक दिवस त्याला न्याय मिळाल्याचे सांगता यावे, हीच आपली प्रार्थना असल्याचे त्यांनी भावनिक शब्दांत नमूद केले. दोषींना कायद्यानुसार कठोर, अगदी फाशीसारखी कडक शिक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत विलंब नको

या प्रकरणाच्या तपासात तसेच न्यायालयीन सुनावणीत कोणताही अनावश्यक विलंब होऊ नये, अशी विनंती राखी अग्रवाल यांनी पंतप्रधानांना केली आहे. दोषींना शक्य तितक्या लवकर कायद्यानुसार कठोर शिक्षा मिळावी, अशी त्यांची मागणी आहे. एका दुःखी आईचा आवाज पंतप्रधानांपर्यंत पोहोचून आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक कारवाई केली जाईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.

Related to this topic: