आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने रेशन दुकानातून पात्र शिधापत्रिका धारकांना केरोसिन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
नागरीकांच्या घरातील स्टोव्ह गेले भंगारात,दुकानातूनही स्टोव्ह गायब
गडचिरोली (Kerosene Supply) : आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्या एलपीजी गॅसच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने रेशन दुकानातून पात्र शिधापत्रिका धारकांना केरोसिन पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र रेशन दुकानातून केरोसिन पुरवठयाची अंमलबजावणी करण्यात अडचणींचा डोंगर उभा ठाकण्याची शक्यता दिसुन येत आहे. नागरीकांच्या घरातील स्टोव्ह भंगारात गेले असुन दुकानातही सद्यास्थितीत स्टोव्ह उपलब्ध नसल्याचे दिसुन येत आहे.
आखाती युद्धामुळे राज्यात एलपीजी गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. शासन टंचाई नसल्याचे भासवित असले तरी नागरीक पहाटे पासूनच गॅस एजंसीसमोर रांगा लावत असल्याचे दृष्य प्रथमच निदर्शनास येत आहे.
आखाती युद्ध केव्हा संपेल व एलपीजी गॅस वितरणाची परिस्थिती केव्हा पुर्वपदावर येईल हे अद्यापही अनिश्चित आहे. या पार्श्वभुमीवर नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रेशन दुकानातून पात्र शिधापत्रिकाधारकांना पुन्हा केरोसीन (रॉकेल) पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत दरमहा प्रति शिधापत्रिका ३ लिटर केरोसिन अनुज्ञेय असेल आणि हे वितरण विशेषतः ग्रामीण व निमशहरी भागात प्राधान्यक्रमाने केले जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या केरोसीन पुरवठा धोरणांतर्गत एलपीजी गॅस टंचाईच्या काळात ग्रामीण व गरजू नागरिकांना स्वयंपाक व दिवाबत्तीसाठी पर्यायी इंधन उपलब्ध करून देणे, मुख्यतः अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थी, तसेच ज्यांच्याकडे गॅस कनेक्शन नाही किंवा गॅस सिलिंडर मिळण्यास उशीर होत आहे, अशा कुटुंबांना प्राधान्य देण्यात येणार आहे.मार्च-एप्रिल २०२६ या तात्पुरत्या कालावधीसाठी विशेष कोटा मंजूर करण्यात आला आहे.
केरोसीनच्या वितरणाची नोंद रेशन दुकानदारांना ऑफलाइन नोंदवहीत ठेवणे अनिवार्य आहे. शिधापत्रिकाधारकांना ४५ दिवसांच्या आत रॉकेल उचलणे बंधनकारक आहे, ज्या गावांत केरोसीन विक्रेता उपलब्ध नाही, तिथे जवळच्या गावातील दुकानातून पुरवठा केला जाईल. साधारणपणे ६० ते ७० रुपये प्रति लिटर दराने हे रॉकेल मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.राज्य सरकारने या वाटपासाठी जिल्हा पुरवठा अधिकार्यांना गाव व तालुका निहाय मागणीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.
केरोसिन स्टोव्ह भंगारात गेले की साहेब !
काही वर्षापुर्वी शासन रेशन दुकानातून केरोसिन वितरीत करीत होते. यावेळी अनेकांच्या घरी केरोसिन स्टोव्ह होते. बाजारात केरोसिनवर चालणारे विविध प्रकारचे स्टोव्ह उपलब्ध होते. मात्र शासनाने केरोसिन पुरवठा बंद केला व उज्ज्वला योजनेअंतर्गत घरोघरी गॅस सिलींडर पुरवठयाचे धोरण आखले. यामुळे नागरीकांच्या घरातील केरोसिन स्टोव्ह भंगारात गेले तसेच गॅस स्टोव्ह बनविणार्या कंपण्यांनीही आपले उत्पादन थांबविले. आता गॅस सिलींडरचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांना दुकानात येणार्या ग्राहकांना केरोसिन वापराची सोय आहे काय या संदर्भात विचारणा करण्याचे आदेश दिले आहेत. दुकानदार दुकानात येणार्या ग्राहकांना या संदर्भात विचारणा करीत असतांना ‘केरोसिन स्टोव्ह भंगारात गेले की साहेब’ असे सांगितल्या जात आहे. केरोसिन पुरवठा झाल्यास पुन्हा नवीन स्टोव्ह खरेदी करावे लागेल. मात्र दुकानातही पुरेशा प्रमाणात स्टोव्ह उपलब्ध नसल्याचे दिसुन येत आहे.