जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कयाधू नदीत पुन्हा घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
हिंगोली (Kayadhu River) : जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कयाधू नदीत पुन्हा घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील कचरा आणि सांडपाणी थेट नदीपात्रात सोडले जात असल्याने पाण्यावर मोठ्या प्रमाणात फेस तयार झाला असून दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
विशेष म्हणजे, केवळ एक महिन्यापूर्वीच १ मे रोजी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते कयाधू नदी स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला होता. प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून नदीपात्रातील कचरा काढण्यात आला होता. त्यावेळी काही दिवस नदीचे पाणी तुलनेने स्वच्छ दिसले. मात्र, सांडपाण्याचा प्रश्न कायम राहिल्याने आणि कचरा टाकणे थांबले नसल्याने पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे.
कयाधू नदी हिंगोली जिल्ह्याच्या मध्यातून वाहत असल्याने तिला ‘जीवनवाहिनी’ मानले जाते. वाशीम जिल्ह्यातील अगरवाडी येथून उगम पावणारी ही नदी ९९ किलोमीटर प्रवास करून नांदेड जिल्ह्यात पैनगंगा नदीला मिळते. मात्र, वाळू उपसा, पाणी उपसा आणि पाण्याचे सुनियोजन न झाल्याने ही नदी आता केवळ जून ते ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंतच वाहते.

सध्या शहरातील मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाले आहे. या दूषित पाण्यावर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती अवलंबून असून जनावरेही हेच पाणी पीत आहेत. त्यामुळे जनावरांमध्ये आजार उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पर्यावरणप्रेमींनी नदीपात्र प्रदूषणमुक्त करण्याची मागणी केली आहे.
उगम ग्रामीण विकास संस्थेसह विविध संस्था कयाधू नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्नशील आहेत. नदीवर साखळी बंधारे बांधण्याचे प्रस्तावही चर्चेत आहेत. मात्र, जोपर्यंत शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडण्यास प्रतिबंध होत नाही आणि कचरा टाकण्यावर कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत केवळ मोहिमांमधून नदीचे आरोग्य सुधारणार नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
५० वर्षांपूर्वी बारमाही वाहणारी कयाधू आज केवळ पावसाळ्यातच दिसते. एक दिवसाच्या मोहिमेऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना आणि लोकसहभागातूनच हिंगोलीची जीवनवाहिनी पुन्हा प्रवाही होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.