परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यासाठी अत्यंत दुःखद घटना घडली आहे.
छत्रपती संभाजीनगरजवळील बीड बायपास परिसरात कारचा अपघात; स्मिता बोरीकर यांचाही मृत्यू, चालक गंभीर जखमी; मंत्री मेघना बोर्डीकर यांची श्रद्धांजली
परभणी जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यासाठी अत्यंत दुःखद घटना घडली आहे. पाथरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गुंज येथील दत्तसंप्रदायाचे ज्येष्ठ संत कालिदास महाराज यांचे आज पहाटे छत्रपती संभाजीनगरजवळील बीड बायपास परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे भाविकांमध्ये शोककळा पसरली असून श्रीक्षेत्र गुंज येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टेंबे स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे दर्शनासाठी गेलेले कालिदास महाराज आपल्या सहकाऱ्यांसह परतीच्या प्रवासात होते. याचदरम्यान बीड बायपास परिसरात त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कालिदास महाराज आणि त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कालिदास महाराज यांनी गेली चार दशके अखंड मौनव्रत स्वीकारून अध्यात्म, सेवा आणि समाजप्रबोधनासाठी आयुष्य वाहिले होते. दत्तसंप्रदायाच्या विचारांचा प्रसार करत त्यांनी असंख्य भक्तांना अध्यात्माची प्रेरणा दिली. व्यसनमुक्ती, सदाचार, निस्वार्थ सेवा आणि लोककल्याणाचा संदेश त्यांनी आपल्या आचरणातून दिल्यामुळे समाजात त्यांच्याबद्दल विशेष आदराचे स्थान निर्माण झाले होते.
मौनव्रत असूनही राज्यभरातील हजारो भाविक श्रीक्षेत्र गुंज येथे त्यांच्या दर्शनासाठी येत असत. साधी राहणी, संयमी जीवनशैली आणि अध्यात्मिक मार्गदर्शनामुळे त्यांनी अनेकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव टाकला होता. त्यामुळे त्यांच्या निधनाची माहिती समोर येताच धार्मिक, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
राज्याच्या मंत्री मेघना बोर्डीकर यांनीही सोशल मीडियावरून कालिदास महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, श्रीक्षेत्र गुंज येथील परमपूज्य कालिदास महाराज यांच्या छत्रपती संभाजीनगरजवळ झालेल्या दुर्दैवी अपघाती निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. समाजाला अध्यात्म, संस्कार आणि मानवतेचा संदेश देणारे कालिदास महाराज यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन, असे त्यांनी नमूद केले.