आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारीदरम्यान रविवारी (13 जुलै) दुर्दैवी दुर्घटना घडली.
सासवड–जेजुरी मार्गावरील भोंगळे मळा परिसरात दुर्घटना; 16 ते 18 जण जखमी, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाखांची मदत जाहीर
जेजुरी : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या वारीदरम्यान रविवारी (13 जुलै) दुर्दैवी दुर्घटना घडली. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसोबत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोला ट्रकने धडक दिल्याने तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला, तर 16 ते 18 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जेजुरीतील भोंगळे मळा परिसरात झालेल्या या अपघातामुळे वारकरी संप्रदायासह राज्यभरातून हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसोबत वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात होते. जेजुरी येथील भोंगळे मळा परिसरात जवळपास 20 वारकऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला एका ट्रकने धडक दिली. या भीषण दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला.
मृत महिलांची ओळख राजश्री शंकर भोसले (रा. मिरज), माधवी राजाराम सलगरे (वय 55, रा. मिरज) आणि नंदा पवार (रा. मलकापूर) अशी झाली आहे. तिन्ही महिला वारकरी सांगली जिल्ह्यातील असल्याची माहिती आहे.
अपघातातील ट्रक नांदेडचा असून तो वारीसाठी शिधा घेऊन जात होता. ट्रकचालकाचे वय 63 वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 16 ते 18 वारकरी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
सुनेत्रा पवारांकडून रुग्णालयात जखमींची विचारपूस
घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी वारकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. जखमींवरील सर्व उपचार मोफत केले जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली.
सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत तीन मृत महिला वारकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली. जखमींच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले.
पंढरपूरच्या दिशेने पायी निघालेल्या वारकऱ्यांची सुरक्षितता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगत वाहनचालकांनी रस्त्यावरील वारकऱ्यांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही सुनेत्रा पवार यांनी केले. जखमी वारकरी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही त्यांनी व्यक्त केली.