राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वेग घेतला आहे.
ईश्वरपूर नगराध्यक्ष अपात्र प्रकरणासाठीच भेट; राष्ट्रवादीतील विलिनीकरणाच्या चर्चांनाही पूर्णविराम
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून वेग घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. मात्र, या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट करत जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली.
जयंत पाटील यांनी सांगितले की, ईश्वरपूर येथील नगराध्यक्षांना अपात्र ठरविण्यात आल्याच्या प्रकरणासंदर्भात चर्चा करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियोजित भेट घेतली होती. या विषयाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मुद्द्यावर चर्चा झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, मुख्यमंत्र्यांकडे आधीच वेळ मागितला होता. वेळ मिळाल्यानंतर ते वर्षा बंगल्यावर गेले आणि सुमारे पाच ते दहा मिनिटांची भेट झाली. त्या दरम्यान अर्थमंत्रीपदासह इतर कोणत्याही राजकीय घडामोडींवर चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पटेल किंवा तटकरे यांच्याशी कोणतीही भेट झाली नसून, आपण ज्या हॉलमध्ये बसलो होतो तेथे अन्य कोणीही उपस्थित नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सातत्याने भेट घेत नसल्याचे सांगताना जयंत पाटील म्हणाले की, त्यांच्या मतदारसंघातील नगराध्यक्ष अपात्रतेचा विषय महत्त्वाचा असल्यामुळे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणे आवश्यक होते. मात्र, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असल्याने त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत केवळ स्थानिक प्रश्नावरच चर्चा झाली असून कोणत्याही राजकीय विषयाला स्पर्श करण्यात आला नसल्याचे त्यांनी पुन्हा अधोरेखित केले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबतही जयंत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. अजित पवार यांच्या निधनानंतर अशा कोणत्याही प्रकारच्या चर्चा झालेल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षातील सर्व आमदार आणि खासदार हे शरद पवार यांच्या नेतृत्वासोबत ठामपणे उभे असल्याचा दावा त्यांनी केला. पक्षामध्ये कोणतीही अस्वस्थता किंवा मतभेद नसून सर्वजण एकत्र काम करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
रेवती सुळे यांच्या लग्नावेळी पटेल आणि तटकरे यांची भेट झाल्याचा उल्लेख करत त्यांनी त्यापलीकडे कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असेही स्पष्ट केले.