दूध भेसळ, कायदा-सुव्यवस्था, पोलिस यंत्रणा आणि अधिवेशनाच्या कामकाजावर जयंत पाटील यांची सरकारवर जोरदार टीका; 'महाराष्ट्र बिहारसारखा होत आहे का?' असा सवाल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकार आणि कायदा-सुव्यवस्था यावर जोरदार टीका करत विधानसभेच्या अधिवेशनात अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले. एका आमदाराच्या पत्नीने संपादकाला फोन करून धमकी दिल्याचा आरोप करत, संबंधित व्यक्ती कोणत्या आमदाराची पत्नी आहे याची चौकशी करून पुढील अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री यांनी याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
दूध भेसळ प्रकरणावर बोलताना जयंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी थेट कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांच्या वक्तव्याचा रोख नेमका कोणत्या आमदाराकडे होता, याबाबत राजकीय चर्चांना वेग आला आहे.
अधिवेशनाच्या कामकाजावर टीका करताना त्यांनी सभागृहातील परिस्थितीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "या अधिवेशनात मंत्री सभागृहात उपस्थित राहत नाहीत, अधिकारीही दिसत नाहीत. सभागृहातील चर्चेला अपेक्षित गांभीर्य राहिलेले नाही. राज्यातील विकास कसा भरकटला हे आपण पाहिले. एका नगरसेवकाने वैद्यकीय कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटनाही राज्याने अनुभवली," असे ते म्हणाले.
कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर बोलताना जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या तपासाचा उल्लेख केला. त्या तपासाची सद्यस्थिती अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचे सांगत त्यांनी सरकारला प्रश्न विचारला. तसेच, "कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृह खात्याकडे आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी दिसत आहे," अशी टीकाही त्यांनी केली.
आपल्या मतदारसंघातील एका व्यक्तीच्या गोळीबारात झालेल्या हत्येचा उल्लेख करत, संबंधित प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप त्यांनी केला. "गुन्हा दाखल होऊ नये यासाठी कोणत्या आमदाराने हस्तक्षेप केला, याची माहिती कॉल रेकॉर्ड तपासून समोर आणावी," अशी मागणी करत त्यांनी, "महाराष्ट्र आता बिहार झालाय का?" असा सवाल उपस्थित केला.
ठाण्यातील जमील शेख हत्येचाही त्यांनी उल्लेख केला. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास अधिकारी नेमण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्यानंतर काय प्रगती झाली याबाबत माहिती समोर आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूरमधील कथित पोलिस- बुकी संगनमताचा आरोप करत जयंत पाटील म्हणाले की, कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांमध्ये तडजोड करून काही आरोपींना सोडले जात असल्याचे आरोप आहेत. दुसरीकडे, केवळ ५०० रुपयांच्या प्रकरणात नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या विसंगतीमुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी होत असल्याची टीकाही त्यांनी केली.
याशिवाय, पोलिसांकडून सुरू असलेल्या कथित हप्तेखोरीचाही त्यांनी उल्लेख केला. "टेबलावर तीन पत्ते खेळले जात असल्याचे फोटो मी स्वतः पाठवले होते, मात्र त्यानंतरही कारवाई झाली नाही," असा दावा त्यांनी केला.
सातारा जिल्ह्यातील एका घटनेचा संदर्भ देताना त्यांनी शंभुराजे यांना पोलिसांनी बाजूला केल्याचा उल्लेख केला. त्यांच्या हाताला दुखापत झाल्यानंतरही त्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर त्यांच्यावर दबाव आणण्यात आल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला. पोलिसांचा अशा प्रकारे वापर केला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी सरकारवर केला.