बारामतीत 2029 च्या निवडणुकीची चर्चा रंगली असून जय पवार यांनी सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचे संकेत दिले.
बारामतीत 2029 ची रंगत आताच; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत? जय पवारांचे सूचक विधान
मुंबई (Jay Pawar Statement) : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवत बारामतीतील राजकीय समीकरणे आपल्या बाजूने झुकवली. त्यामुळे सध्या त्या अजित पवार यांच्या राजकीय वारसदार म्हणून पाहिल्या जात आहेत. मात्र, मतदानाच्या दिवसापासूनच 2029 च्या निवडणुकीत बारामतीतून उमेदवारी कोणाला मिळणार, यावर चर्चा रंगू लागली आहे.
रोहित पवार, जय पवार आणि युगेंद्र पवार यांच्या वक्तव्यांमुळे बारामतीतील एकाच जागेसाठी तीन पवार मैदानात उतरणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर आता जय पवार यांनी पुन्हा एकदा 2029 च्या निवडणुकीबाबत भाष्य करत महत्त्वाचे संकेत दिले आहेत.
खासदारकीसंदर्भात आपले नाव चर्चेत असल्याच्या प्रश्नावर जय पवार यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. “चर्चा होतेय, पण मी इथेच राहून सर्वांसाठी काम करणार,” असे सांगत त्यांनी बारामतीत सक्रिय राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
तसेच, 2029 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोठे विधान केले. “आमच्या सहकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती. बारामतीकरांची इच्छा होती की दादांना मुख्यमंत्री पाहायचे होते. आता वहिनीही खूप मेहनत घेत आहेत. त्यामुळे 2029 मध्ये बारामतीतून विधानसभेसाठी सुनेत्रा पवारच उमेदवार असतील,” असे ते म्हणाले. यासोबतच “त्या मुख्यमंत्री म्हणून निवडणूक लढवतील, अशी आमची आशा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, ही कार्यकर्त्यांची आणि बारामतीकरांची दीर्घकालीन इच्छा होती. मात्र त्यांच्या निधनामुळे ती पूर्ण होऊ शकली नाही. आता सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून ही इच्छा पूर्ण होईल, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
दरम्यान, राज्यात सध्या महायुतीचे सरकार असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडूनही मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारीचे संकेत वेळोवेळी दिले जातात. त्यामुळे 2029 मध्ये महायुतीकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.