जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारे नेते म्हणून ख्याती असलेले कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या वंजारवाडा भागातील निवासस्थानासमोर दररोज सकाळी ‘जनता दरबार’ भरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
हिंगोलीसह पाच जिल्ह्यांतील दीडशे-दोनशे नागरिक रोज सकाळीच घेतात भेटी; जागेवरच सुटतात समस्या!
हिंगोली (Janata Darbar) : जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारे नेते म्हणून ख्याती असलेले कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या वंजारवाडा भागातील निवासस्थानासमोर दररोज सकाळी ‘जनता दरबार’ भरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
केवळ हिंगोली जिल्हाच नव्हे, तर शेजारील वाशिम, बुलढाणा, परभणी, नांदेड आणि बीड अशा विविध जिल्ह्यांतून रोज १५० ते २०० नागरिक आपल्या न्याय्य हक्काच्या आणि वैयक्तिक समस्या घेऊन आमदार बांगर यांच्या दारात येत आहेत.
सकाळी ७ वाजल्यापासूनच नागरिकांची रीघ
आमदार संतोष बांगर यांच्या भेटीसाठी पहाटेपासूनच त्यांच्या निवासस्थानाबाहेर नागरिकांचा गराडा पडतो. सकाळी अगदी ७ वाजेपासूनच विविध भागांतून आलेले नागरिक आपल्या अर्जांसह हजेरी लावतात. यामध्ये शेतीचे प्रश्न, कौटुंबिक अडचणी, प्रशासकीय कामांमधील अडवणूक आणि प्रामुख्याने वैद्यकीय उपचारांशी संबंधित समस्या घेऊन येणाऱ्या गरजू रुग्णांचा व त्यांच्या नातेवाईकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.
‘ऑन द स्पॉट’ सुटतात प्रश्न
या जनता दरबाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आमदार बांगर यांच्या कामाचा ‘झंझावाती’ वेग. निवेदने घेऊन आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे ते शांतपणे ऐकून घेतात. प्रश्न समजून घेताच ते जागेवरूनच थेट संबंधित शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा नामांकित रुग्णालयांच्या प्रशासनाला फोन लावतात. त्यांच्या या ‘ऑन द स्पॉट’ कॉलमुळे प्रशासकीय यंत्रणा तातडीने हलते आणि गरिबांची रखडलेली कामे काही मिनिटांतच मार्गी लागतात.
“आमदार साहेबांकडे गेलं की काम होणारच!”
“आम्ही अनेक दिवसांपासून एका शासकीय कामासाठी चकरा मारत होतो, पण आमदार बांगर यांनी एका फोनवर आमचा प्रश्न सोडवला,” अशी भावना वाशिमवरून आलेल्या एका नागरिकाने व्यक्त केली.
“बांगर साहेबांकडे गेलं की हक्काने काम होतं, तिथे कुणी रिकाम्या हाताने परतत नाही,” असा दृढ विश्वास आता जनमानसात निर्माण झाला आहे.
‘कार्यसम्राट’ पदवी सार्थ
वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देणे असो की तात्काळ उपचार सुरू करणे, आमदार बांगर स्वतः वैयक्तिक लक्ष घालून ते काम पूर्णत्वास नेतात. त्यांच्या याच तत्परतेमुळे आणि ‘लोकाभिमुख’ कार्यपद्धतीमुळे नागरिकांनी त्यांना ‘कार्यसम्राट आमदार’ ही उपाधी दिली आहे.
दिवसेंदिवस त्यांच्या दारात येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या ही त्यांच्या लोकप्रियतेची आणि जनतेच्या त्यांच्यावरील अढळ विश्वासाची साक्ष देत आहे.