चालू वर्षात ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची आणि पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार
पातूर (Jalyukt Shivar 2.0) : चालू वर्षात ‘अल निनो’च्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची आणि पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या संभाव्य संकटावर मात करण्यासाठी तसेच गावातील भूजल पातळी टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने शासनाच्या जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत मौजे हिंगण येथे जलतारा शोष खड्ड्यांच्या निर्मितीच्या कामाला उत्साहात सुरुवात करण्यात आली.
हे काम पातूर येथील तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आले आहे. यावेळी मंडळ कृषी अधिकारी मनोज मधुकर पेंढारकर यांनी प्रत्यक्ष स्थळी उपस्थित राहून कामाचा शुभारंभ केला तसेच शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन केले.
जमिनीची जलधारण क्षमता वाढणार
यावेळी बोलताना कृषी अधिकारी मनोज पेंढारकर यांनी सांगितले की, जलतारा शोष खड्ड्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जमिनीत अधिक प्रमाणात मुरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे परिसरातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. तसेच जमिनीची जलधारण क्षमता मजबूत झाल्याने उन्हाळ्याच्या काळात आणि पावसाच्या खंडाच्या कालावधीतही विहिरी व कूपनलिकांना पाणी उपलब्ध राहण्यास मदत होईल.
शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
गावातील पाणी समस्या दूर करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाबद्दल शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. गावाच्या विकासासाठी आणि जलसंधारणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या कामात लहान-मोठ्या सर्व शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवित श्रमदान आणि सहकार्य केले आहे.
जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत सुरू झालेल्या या उपक्रमामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होणार असून, शाश्वत जलव्यवस्थापनाच्या दिशेने गावाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचे मानले जात आहे.