केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेत सध्या तांत्रिक अडचणींचे मोठे संकट निर्माण झाले आहे.
घरकुल बांधकामे झाली ठप्प
बामणी फाटा (Housing Scheme): केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी घरकुल योजनेत सध्या तांत्रिक अडचणींचे मोठे संकट निर्माण झाले आहे. पारदर्शकता व गती वाढविण्यासाठी सुरू करण्यात आलेली 'स्पर्श' डिजिटल प्रणालीच आता लाभार्थ्यांसाठी अडथळा ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
ग्रामीण भागातील हजारो लाभार्थ्यांचे एफटीओ तयार होऊनही गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून त्यांच्या खात्यात निधी जमा झालेला नाही. त्यामुळे मंजूर घरकुल असूनही अनेकांची घरे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. घरकुल योजनेत (Housing Scheme) निधी वितरणासाठी प्रत्येक टप्प्यावर फोटो अपलोड, जिओ-टॅगिंग, आधार प्रमाणीकरण आणि ऑनलाइन मंजुरी आवश्यक असते. मात्र 'स्पर्श' प्रणालीतील तांत्रिक त्रुटी, सर्व्हर डाऊन होणे, आधार-बँक लिंकिंगमधील अडचणी यामुळे निधी हस्तांतरण प्रक्रिया ठप्प झाली आहे. अनेक वेळा सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही एफटीओ पुढे सरकत नसल्याने लाभार्थ्यांमध्ये संताप वाढत आहे.
हजारो लाभार्थ्यांचा निधी रखडला
स्थानिक प्रशासनानेही या समस्येची कबुली दिली असून, वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. तरीही प्रत्यक्षात परिस्थितीत कोणताही बदल दिसून येत नाही. त्यामुळे त्रस्त लाभार्थी आता जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन उत्तर मागण्याच्या तयारीत आहेत.
निधी वितरण सुरळीत करण्याची मागणी
ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांसाठी घरकुल योजना (Housing Scheme) अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र डिजिटल प्रक्रियेतील अडथळ्यांमुळे ही योजना लाभार्थ्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. रखडलेले एफटीओ तात्काळ मंजूर करावेत, 'स्पर्श' प्रणालीतील त्रुटी त्वरित दूर कराव्यात, निधी वितरण प्रक्रिया सुलभकरावी, गरज असल्यास ऑफलाइन पर्याय उपलब्ध करावा, ह्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष घालून तांत्रिक समस्या दूर करून निधी वितरण सुरळीत करावे, अशी मागणी होत आहे.