परिसरात चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून सातत्याने होत असलेल्या चोऱ्यांमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आखाडा बाळापूर (House Burglary) : परिसरात चोरीच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून सातत्याने होत असलेल्या चोऱ्यांमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कान्हेगाव येथे अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून तब्बल २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कान्हेगाव येथील लक्ष्मण नंदकिशोर पाटील यांच्या जुन्या घराच्या माडीवर २२ मे रोजी सायंकाळच्या सुमारास चोरट्यांनी शिडीच्या सहाय्याने प्रवेश केला. देवघरातून घरात प्रवेश करून त्यांनी लोखंडी कपाटाचे कुलूप तोडले.
कपाटातील रोख १ लाख रुपये, ५० हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, ३० हजार रुपये किमतीची दुसरी सोन्याची अंगठी तसेच ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे, पोलीस उपनिरीक्षक सुनील रोहीणकर, शिवाजी पवार यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देत पाहणी केली. यावेळी श्वान पथक व ठसे तज्ज्ञ पथकानेही तपासणी केली.
मागील काही दिवसांपासून आखाडा बाळापूर शहरासह शेवाळा, देवजना आणि कान्हेगाव परिसरात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. शेतशिवार तसेच कयाधू नदीकाठ परिसरातही मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत असल्याने शेतकरी व नागरिक त्रस्त झाले असून पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.