Hingoli Medical College: हिंगोलीत एमआरआय सेंटरमध्ये रुग्णांची आर्थिक लुट होत असल्याच्या आरोपावर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कार्यालयात बैठक करून चालकाला फटकारले.
रुग्णाच्या तक्रारीची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतली तत्परतेने दखल
रुग्णांची आर्थिक लुट झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील
हिंगोली (Hingoli Medical College) : हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एमआरआय विभागात रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी २९ मे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत सेंटर चालकाला चांगलेच फटकारले. रुग्णांची लुट झाल्यास गंभीर परिणाम होतील असा सज्जड दम त्यांनी दिला. त्यानंतर सेंटर चालकाच्या वरिष्ठांनी माफी मागितल्यानंतर वादावर पडदा पडला.
हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागातील रहिवासी वसंत यांनी त्यांची पत्नी सुवर्णा वाघ यांना २७ मे बुधवारी एमआरआय करण्यासाठी शासकीय रुग्णालयात आणले होते. यावेळी वसंत वाघ यांनी सकाळी ९:३० वाजता एमआरआय कक्षात विचारणा केली असता, त्यांना प्रथम १७०० रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा २१५० रुपयांची मागणी केली तर तिसऱ्यावेळी ६४०० रुपये लागतील असे सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून सदर रक्कमही घेण्यात आली. या प्रकारानंतर वसंत वाघ यांनी वैद्यकीय रुग्णालय प्रशासनाकडे निवेदन देऊन रुग्णांची आर्थिक लुट होत असल्याचा आरोप केला.
सदर प्रकरण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गांभीर्याने घेऊन या प्रकरणात २९ मे बुधवार रोजी तातडीने बैठक घेतली. यावेळी तक्रारदार वाघ यांच्यासह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस तसेच एमआरआय सेंटरच्या कृष्णा डायग्नोस्टीकचे राज्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर तक्रारदार वसंत वाघ, अधिष्ठाता डॉ. मुंगल यांच्याकडे विचारणा केली. त्यानंतर कृष्णा डायग्नोस्टीकच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी त्यांनी सेंटर चालकाला चांगलेच फटकारले.
शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात एमआरआयसाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय व आर्थिक लुट होता कामा नये. यापुढे असे प्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा शब्दात त्यांनी सज्जड दम दिला. त्यानंतर सेंटर चालकांनी माफी मागितली. यानंतर असे प्रकार होणार नाही असे सांगितले. त्यानंतर या वादावर पडदा पडला आहे.