खा. नागेश पाटील आष्टीकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा अधूनमधून सुरू होत्या.
हिंगोली (Hingoli Politics) : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ हिंगोलीतही यशस्वी झाल्याची चर्चा असून, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
मागील काही महिन्यांपासून खा. नागेश पाटील आष्टीकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा अधूनमधून सुरू होत्या. मात्र प्रत्येक वेळी त्यांनी या चर्चेचे खंडन करत शिवसेनेतच राहण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला होता. विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये तसेच पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पक्षनिष्ठेची भूमिका मांडली होती.
‘ऑपरेशन टायगर’बाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत तर “मला पंतप्रधान केले तरच शिवसेना सोडण्याचा विचार करेन,” असे मिश्कील वक्तव्यही त्यांनी केले होते. विशेष म्हणजे, या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले त्यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर हे नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत.
या निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान होणार असताना आदल्या दिवशी नागेश पाटील आष्टीकर हे ‘नॉट रिचेबल’ झाल्याची माहिती समोर आली. राज्यातील सहा खासदार स्वतंत्र गट म्हणून लोकसभेत बसणार असल्याच्या बातम्या बुधवारी पहाटेपासून विविध माध्यमांत झळकत होत्या. या सहा खासदारांमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचाही समावेश असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, खा. नागेश पाटील आष्टीकर किंवा दोन्ही शिवसेनांकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नागेश पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडायची असेल तर त्यांनी खासदारकीचाही राजीनामा द्यावा, अशी मागणी उबाठा शिवसैनिकांकडून केली जात आहे.
खासदार झालेल्या सगळ्याच पुढाऱ्यांनी केला दगाफटका?
हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेल्या अनेक खासदारांनी आपल्या मूळ पक्षाशी फारकत घेतल्याचा इतिहास असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.
अलिकडच्या काळात अनेक वेळा खासदार राहिलेले दिवंगत उत्तमराव राठोड यांनी उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसविरोधात बंडखोरी करत ‘नारळाचे झाड’ या चिन्हावर अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
हिंगोलीतून प्रथमच शिवसेनेला खासदारकी मिळवून देणारे दिवंगत विलास गुंडेवार यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली; मात्र अॅड. शिवाजी माने यांनी त्यांचा पराभव करून लोकसभेची जागा पुन्हा शिवसेनेकडे आणली.
यानंतर शिवाजी माने यांनीही शिवसेनेची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवाजी मानेंचा पराभव करून खासदार झालेल्या सूर्यकांता पाटील पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर खासदार आणि केंद्रीय मंत्री झाल्या. त्यानंतर जागावाटपाच्या वादातून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
या काळात शिवसेनेचे खासदार राहिलेले सुभाष वानखेडे यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर एकसंघ शिवसेनेकडून खासदार झालेल्या हेमंत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
त्यानंतर नागेश पाटील आष्टीकर हिंगोलीचे खासदार झाले. आता त्यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची चर्चा रंगली आहे.
अलिकडच्या काळातील हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय इतिहासात दिवंगत खासदार राजीव सातव यांचा अपवाद वगळता, उत्तमराव राठोड ते नागेश पाटील आष्टीकर या काळातील अनेक नेत्यांनी आपल्याला संधी देणाऱ्या पक्षाची साथ सोडल्याचे आरोप वारंवार होत आले आहेत.