Breaking News
  • साताऱ्यातील पाथरपुंजला सर्वात जास्त पावसाची नोंद
  • लोणावळ्यात 24 तासात 94 मिलिमीटर पावसाची नोंद.
  • सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला
  • पुण्यातील स्टील गोडाऊनवर गोळीबार प्रकरणी वापरण्यात आलेली बाईक पोलिसांकडून जप्त
  • विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
  • जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे वीज पडून एका तरुण शेतकऱ्याचा मृत्यू
  • अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्यात दमदार पाऊस
  • नाशिकच्या सातपूर एमआयडीसी परिसरात एका कंपनीला भीषण आग
  • महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरोधात सोलापुरातील मनसे झाली आक्रमक

होम > आपले शहर > मराठवाडा > हिंगोली

लग्नसराईत नको निष्काळजीपणा; हिंगोली पोलिसांचा दागिण्यांसाठी सुरक्षा मंत्र

लग्नसराईच्या धामधुमीत बँक लॉकरमधून घरी आणलेले दागिने कपाटातच ठेवण्याची चूक अनेकांना महागात पडत आहे.


लग्नसराईत नको निष्काळजीपणा हिंगोली पोलिसांचा दागिण्यांसाठी सुरक्षा मंत्र

Hingoli Police Advisory |

हिंगोली (Hingoli Police Advisory) : लग्नसराईच्या धामधुमीत बँक लॉकरमधून घरी आणलेले दागिने कपाटातच ठेवण्याची चूक अनेकांना महागात पडत आहे. हाच धोक्याचा इशारा देत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांनी नागरिकांना दागिन्यांच्या सुरक्षेबाबत विशेष आवाहन केले आहे.

सध्या लग्नसराईचा मोसम जोरात सुरू असल्याने अनेक कुटुंबांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने लॉकरमधील दागदागिने घरी आणले आहेत. मात्र लग्न सोहळा पार पडल्यानंतरही हे मौल्यवान अलंकार तात्काळ लॉकरमध्ये जमा न करता घरातील कपाटातच ठेवले जातात. घरात चोरी झाल्यास चोरट्यांचे पहिले टार्गेट हेच कपाट असते आणि क्षणार्धात लाखोंचे दागिने लंपास होतात, असे भोसले यांनी स्पष्ट केले. त्यामुळे लग्नकार्यासाठी काढलेले दागिने काम संपताच त्वरित बँकेच्या लॉकरमध्ये जमा करावेत. तोपर्यंत ते कपाटा व्यतिरिक्त इतर सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, असा ‘सुरक्षा मंत्र’ त्यांनी दिला आहे.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये अनेक कुटुंबे मूळ गावी किंवा पर्यटनासाठी बाहेरगावी जातात. अशावेळी घर बंद असल्याची कल्पना शेजार्‍यांना अवश्य द्यावी. घराला शक्यतो आतून कडी-कुलूप लावावे व एक दिवा चालू ठेवावा, जेणेकरून घरात कोणीतरी असल्याचा आभास होईल. रस्त्यावरून जाताना घराला बाहेरून कुलूप लावलेले दिसणार नाही, याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

गल्लीतील नागरिकांनी एकत्र येऊन सीसीटीव्ही बसवावेत. सराफा व्यावसायिक व बँक अधिकार्‍यांनी आपल्या वॉचमनना सतर्क करून आवश्यक सूचना द्याव्यात. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल दिसताच क्षणाचाही विलंब न करता हिंगोली पोलिसांच्या टोल फ्री क्रमांक ११२ वर संपर्क साधावा.

उन्हाळ्यात उकाड्यामुळे अनेक जण घराबाहेर उघड्यावर झोपतात. याच संधीचा फायदा घेऊन चोरटे झोपलेल्या महिलांचे दागिने चोरून नेतात, तसेच बंद घरांचे कुलूप तोडून कपाटातील ऐवज लंपास करतात. चोरीचे प्रमाण या काळात वाढते, त्यामुळे प्रत्येकाने मौल्यवान वस्तूंबाबत अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे.

हिंगोली पोलीस दल २४ तास नागरिकांच्या सेवेसाठी सतर्क असून, नागरिकांनीही स्वतःची व आपल्या संपत्तीची काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांनी केले आहे.

पोलिसही सतर्क; नागरिकांनी खबरदारी घ्यावी

सध्या सुरू असलेली लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची घरे चोरट्यांकडून फोडली जात आहेत. चोर्‍यांवर आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन तत्पर असले तरी नागरिकांनीही या चोर्‍या टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले यांनी दिली.