Hingoli Nationalist Congress Party: महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी हिंगोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील राष्ट्रवादी काँग्रेस
हिंगोली (Hingoli Nationalist Congress Party) : महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मधील तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी हिंगोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका रुबिना मोहम्मद वाजीद यांना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी अपात्र घोषित केले आहे. कायद्यातील विहित दिनांकानंतर तिसरे अपत्य झाल्याने त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचा आदेश 23 जून 2026 रोजी पारित करण्यात आला.
सय्यद ताहेर सय्यद नासेर अली जुलाहा, रा. वार्ड नं.13 (अ) पेन्शनपुरा हिंगोली यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत म्हटले होते की, नगरसेविका रुबिना वाजीद यांना कायद्यातील विहित दिनांकानंतर तिसरे अपत्य झाले असल्याने त्यांना अधिनियमातील कलम 44 अन्वये सदस्यपदासाठी अपात्र ठरवावे. या तक्रारीची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी नगरसेविकांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती.
सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षकारांची बाजू, सादर करण्यात आलेले जन्म नोंद उतारे, शपथपत्रे आणि मुख्याधिकारी, नगर परिषद हिंगोली यांचा 20 मार्च 2026 चा अहवाल तपासण्यात आला. डॉ. एस. आर. तापडिया यांच्या हॉस्पिटलमधील प्रसूती व जन्म नोंद अभिलेखानुसार, नगरसेविकेचे पहिले अपत्य शेख मोहम्मद शहाब 26 ऑक्टोबर 2004 रोजी, दुसरे अपत्य मिस्वाह आनाम 27 डिसेंबर 2006 रोजी तर तिसरे अपत्य सफुरा 2 ऑक्टोबर 2011 रोजी जन्मले.
महाराष्ट्र नगर परिषद अधिनियम, 1965 च्या कलम 16 (1) (क) नुसार, 12 सप्टेंबर 2001 नंतर दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेली व्यक्ती सदस्य म्हणून निवडून येण्यास किंवा सदस्य म्हणून कायम राहण्यास अपात्र ठरते. लोकसंख्या नियंत्रणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. (Hingoli Nationalist Congress Party) राज्य निवडणूक आयोगाच्या 31 मार्च 2009 व 12 जुलै 2001 च्या पत्रानुसारही दोनपेक्षा अधिक मुले असणाऱ्या व्यक्ती स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवण्यास अपात्र आहेत.
सर्व कागदपत्रे आणि कायद्याचा विचार करून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी रूबिना मोहम्मद वाजीद यांना कलम 44 मधील अधिकारानुसार अपात्र घोषित केले. या आदेशामुळे नगर परिषद हिंगोली येथील त्यांचे सदस्यपद 23 जून 2026 पासून रिक्त झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद हिंगोली यांना या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून पुढील वैधानिक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधितांना कायद्यानुसार सक्षम न्यायालयात अपील करण्याचा अधिकार असल्याचेही आदेशात नमूद केले आहे. सय्यद ताहेर यांच्यावतीने अँड. अविनाश बांगर यांनी युक्तिवाद केला. या निर्णयामुळे हिंगोलीच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.