Hingoli National Highway: हिंगोलीतील खानापूर-चित्ता महामार्ग क्रमांक 161चा तीन वर्षांतच निकृष्ट दर्जाचा उत्कृष्ट नमुना दिसून आला. 1976 कोटींच्या खर्चानंतरही गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह.
निकृष्ट दर्जाचा उत्कृष्ट नमुना; अवघ्या तीन वर्षातच पडले पितळ उघडे
खानापूर चित्ता (Hingoli National Highway) : हिंगोली तालुक्यातील विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 वरील वाशीम-वारंगाफाटा चौपदरी रस्त्याचे बांधकाम अवघ्या तीन वर्षांतच निकृष्ट दर्जाचे निघाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील खानापूर-चित्ता सावरखेडा दरम्यानच्या शिवारात काँक्रीट रस्त्याचा अख्खा स्लॅब खचल्याने तो पूर्णपणे उखडून काढावा लागला आहे.
सप्टेंबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन झाले होते. पांगरी ते वारंगाफाटा या 42 किलोमीटरच्या टप्प्यासाठी 1042 कोटी रुपये खर्च करण्यात आले. संपूर्ण अकोला-वारंगाफाटा कॉरिडॉरचा खर्च 1976 कोटी रुपये आहे. प्रति किलोमीटर जवळपास 25 कोटी रुपये खर्चून बांधलेल्या या काँक्रीट रस्त्याचे आयुष्य 30 वर्षे अपेक्षित असताना तीन वर्षांतच रस्त्याला मोठ मोठ्या भेगा पडून स्लॅब खचला.
खानापूर-चित्ता सावरखेडा दरम्यान धोकादायक बनलेला पॅनल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकला आहे. सध्या या ठिकाणी वाहतूक एकेरी मार्गाने सुरू असून तात्पुरती मुरूम टाकण्यात आला आहे. या मार्गावरून शेतमाल, दूध आणि प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. पावसाळा तोंडावर आल्याने काम वेळेत पूर्ण न झाल्यास नागरिकांचे हाल होण्याची भीती स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी हा (Hingoli National Highway) रस्ता अद्याप 'डिफेक्ट लायबिलिटी पिरियड' मध्ये असल्याने कंत्राटदार कंपनीकडूनच विनामूल्य दुरुस्ती करून घेतली जाईल असे सांगितले आहे. पावसाळ्यापूर्वी कायमस्वरूपी काँक्रीटीकरण पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र, कोट्यवधी रुपये खर्च करूनही तीन वर्षांत रस्त्याची दुरवस्था झाल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर आणि देखरेख यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.