Hingoli Hunger Strike: शहरातील तलाबकट्टा भागातील सय्यद कलीम सय्यद सलिम यांच्या खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपी अद्यापही अटक न झाल्याने मयताच्या कुटुंबीयांनी लेकरा बाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
हिंगोली (Hingoli Hunger Strike) : शहरातील तलाबकट्टा भागातील सय्यद कलीम सय्यद सलिम यांच्या खून प्रकरणातील दोन्ही फरार आरोपी अद्यापही अटक न झाल्याने मयताच्या कुटुंबीयांनी लेकरा बाळांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. या प्रकरणी पोलिस निरीक्षक देवेंद्र सिंह ठाकुर यांनी उपोषणार्थींशी चर्चा केली. फरार असलेल्या दोन्ही आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.
त्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे यांनी या प्रकरणात लेखी आश्वासन दिले. पोलिसांनी दिलेल्या लेखी हमीमुळे मयताच्या कुटुंबीयांनी नियोजित (Hingoli Hunger Strike) आमरण उपोषण मागे घेतले आहे. यावेळी नगरसेवक हमीद प्यारेवाले, चंदू लव्हाळे, बासीद मौलाना, जुबेर मामू, आरिफ लाला, इरफान भाई व फिरदोस पठाण यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, 7 फेब्रुवारी रोजी सय्यद कलीम यांच्यावर मेहराजूलूम मस्जिदजवळ तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून खून करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार सिराज मोहम्मद युनूस व मोहम्मद कैफ मोहम्मद युनूस कुरेशी हे दोघे आरोपी चार महिने उलटूनही फरार आहेत. आरोपींना अटक करण्याची मागणी घेऊन कुटुंबीयांनी 27 मे रोजी नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांना निवेदनही दिले होते. तरीही कारवाई न झाल्याने 8 जून रोजी कुटुंबीयांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता.
दरम्यान या (Hingoli Hunger Strike) प्रकरणात आमदार तानाजीराव मुटकुळे यांनीही हिंगोली शहर पोलिसांची भ्रमणध्वनीवर संपर्क साधून पुण्यातील फरार आरोपी तात्काळ अटक करावे अशा सूचना केल्या होत्या. त्याचप्रमाणे उपोषण सुरू असताना शिवसेनेचे नगरपरिषद गटनेते श्रीराम बांगर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश पाचपुते यांनीही उपोषणार्थींची भेट घेतली होती.