Hingoli child marriage: हिंगोली तालुक्यात ग्राम बाल संरक्षण कक्षाने तीन बालविवाह रोखले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या आदेशानुसार विवाह सोहळ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले.
हिंगोली (Hingoli child marriage) : तालुक्यात रविवारी, 10 मे रोजी दुपारी ग्राम बाल संरक्षण कक्षाच्या पथकाने थेट विवाहस्थळी धडक देऊन तीन बालविवाह रोखले. बासंबा येथे एकाच कुटुंबातील दोन अल्पवयीन मुलींचे, तर कळमनुरी तालुक्यातील रामेश्वरतांडा येथे एका मुलीचे लग्न होणार होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व विवाह सोहळ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश यंत्रणांना दिले आहेत. त्यानुसार मंगल कार्यालय चालकांची बैठक घेऊन विवाहाची पूर्वसूचना देणे बंधनकारक करण्यात आले असून, गावस्तरीय समित्यांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बासंबा येथे एकाच कुटुंबातील दोन मुलींचे बालविवाह (Hingoli child marriage) होणार असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास विभागाला मिळाली. त्यानुसार संतोष दरपलवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ॲड. सरस्वती कोरडे, सदस्या अनुराधा पंडीत, रामप्रसाद मुडे, सचिन पठाडे, बासंबा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप जमादार, कर्मचारी मार्कड व ग्रामपंचायत अधिकारी ठोके यांच्या पथकाने बासंबा गाठले.
विवाहाची तयारी पूर्ण झाली होती. मात्र चौकशीत दोन्ही मुली अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. ॲड. कोरडे यांनी कुटुंबाला बालविवाहाचे दुष्परिणाम आणि कायद्याने हा गुन्हा असल्याचे समजावून सांगितले. त्यानंतर कुटुंबाने दोन्ही विवाह थांबवले. यानंतर पथकाने रामेश्वरतांडा येथे जाऊन आणखी एक बालविवाह रोखला.