मराठवाड्यात पुन्हा एकदा भूगर्भातील हालचाली तीव्र झाल्याचे दिसून आले असून, गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्याला भूकंपाचे दोन धक्के जाणवले.
वसमत तालुक्यातील शिरली येथे भूकंपाचा केंद्रबिंदू; सुदैवाने जीवितहानी नाही, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
नांदेड : मराठवाड्यात पुन्हा एकदा भूगर्भातील हालचाली तीव्र झाल्याचे दिसून आले असून, गुरुवार, ९ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री हिंगोली, नांदेड आणि परभणी जिल्ह्याला भूकंपाचे दोन धक्के जाणवले. पहिला धक्का रात्री १:३७ वाजता, तर दुसरा धक्का २:१५ वाजता बसला. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र आणि जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राच्या अधिकृत माहितीनुसार, या दोन्ही भूकंपांची तीव्रता रिश्टर स्केलवर अनुक्रमे ४.६ आणि ३.६ इतकी नोंदविण्यात आली आहे.
जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राच्या माहितीनुसार, भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शिरली गावात, जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर होता. हे ठिकाण तेलंगणातील निजामाबादपासून सुमारे १३१ किलोमीटर अंतरावर असल्याचेही अधिकृतरीत्या स्पष्ट करण्यात आले आहे.
मध्यरात्री बहुतांश नागरिक गाढ झोपेत असताना अचानक जमिनीतून गूढ आवाज येऊ लागला आणि घरे हादरू लागली. घरांमधील छताचे पंखे, खिडक्यांच्या तावदाने तसेच भांडी हलू लागल्याने नागरिकांना भूकंपाची जाणीव झाली. नांदेड शहर, अर्धापूर, मुदखेड तसेच हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये हे धक्के स्पष्टपणे जाणवले. अचानक झालेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
प्राथमिक माहितीनुसार, या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, ग्रामीण भागातील काही जुनी व कच्ची घरे यांना किरकोळ तडे गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून नुकसानाचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे.
गेल्या काही वर्षांपासून नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचे भूकंपाचे धक्के वारंवार जाणवत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण कायम आहे. यावेळीही भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात असला तरी त्याचे परिणाम शेजारील नांदेड आणि परभणी जिल्ह्यांतही जाणवले. त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले आहे.
घाबरू नका, सतर्क राहा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचे आवाहन
एकापाठोपाठ दोन धक्के बसल्यामुळे पुढील काही तासांमध्ये आणखी सौम्य धक्के बसण्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येत नाही. मात्र, भूकंपाची पूर्वकल्पना देणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नसल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी तातडीने घराबाहेर पडून मोकळ्या जागेत आश्रय घ्यावा तसेच प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.