Hingoli Earthquake: हिंगोली जिल्ह्यात भूकंपाने १० घरांवर अंशत: नुकसान झाले तर औंधा नागनाथ व वसमत तालुक्यातील ९५ घरांचे भिंती तडपली. प्राथमिक पंचनाम्यांच्या कारवाई पूर्ण
औंढा नागनाथ १० तर वसमत तालुक्यात ९५ घरांचे अंशतः नुकसान
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – प्रशासनाचे आवाहन
हिंगोली (Hingoli Earthquake) : जिल्ह्यात गुरुवार ९ जुलै रोजी झालेल्या भूकंपाच्या सौम्य धक्क्यानंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी भूकंप बाधित गावांना भेटी देत गावनिहाय प्राथमिक पाहणीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे संबंधित यंत्रणेला आदेश दिले होते. सायंकाळपर्यंत पंचनाम्यांची कार्यवाही पूर्ण झाली असून, अहवाल प्राप्त झाले आहेत. या अहवालानुसार जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र १०५ घरांचे अंशत: नुकसान झाल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी सांगितले.
राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या अहवालानुसार आज गुरुवारी झालेल्या भूकंपाचे केंद्र हिंगोली (Hingoli Earthquake) परिसरात असून सर्व धक्क्यांची खोली १० किलोमीटर इतकी नोंदविण्यात आली आहे.भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तात्काळ सर्व तहसील प्रशासन, महसूल यंत्रणा व संबंधित विभागांना परिस्थितीची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. गावनिहाय पंचनामे व प्राथमिक पाहणी करण्यात आली असून, प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्राथमिक नुकसान अहवालानुसार हिंगोली, कळमनुरी व सेनगाव तालुक्यांत कोणतेही नुकसान झाले नाही.
औंढा नागनाथ तालुक्यातील कंजारा येथे २ तर आमदरी येथील ८ घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. तर वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे, वापटी, कुपटी, धामणगाव, खंडाळा, सिरळी आणि राजवाडी या गावांमध्ये ९५ घरांच्या भिंतींना तडे गेल्याची नोंद झाली असून संबंधित महसूल यंत्रणेकडून पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच अफवा पसरवू नयेत, असे आवाहन केले आहे. (Hingoli Earthquake) भूकंपासंदर्भातील अधिकृत माहिती प्रशासनामार्फत वेळोवेळी देण्यात येत असून, नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी संपर्क साधावा, असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.