Hingoli Power Supply: वीज पुरवठ्याचा मोठा खोळंबा सुरू आहे. वीज येते आणि लगेच जाते. या लपंडावामुळे सामान्य नागरिक, शेतकरी आणि लहान व्यावसायिक हैराण
हिंगोली (Hingoli Power Supply) : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून वीज पुरवठ्याचा मोठा खोळंबा सुरू आहे. वीज येते आणि लगेच जाते. या लपंडावामुळे सामान्य नागरिक, शेतकरी आणि लहान व्यावसायिक हैराण झाले आहेत.
हिंगोली शहरात दिवसातून अनेक वेळा वीज बंद होत आहे. ग्रामीण भागात तर परिस्थिती आणखी गंभीर आहे. रात्री उशिरा २ ते ३ तासांसाठीच वीज दिली जात आहे. महावितरणच्या स्थानिक अधिकार्यांचे नियोजन पूर्णपणे कुचकामी ठरले आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडीत होतो. फॉल्टची तक्रार करूनही तासंतास कर्मचारी येत नाहीत. कार्यालयात संपर्क साधला तर 'वरून आदेश नाही' किंवा 'लाइनमन कामावर नाही' अशी उत्तरे दिली जात आहेत. तर महावितरणने दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर ग्राहक संपर्क साधतात अशावेळी भ्रमणध्वनी देखील उचलण्यात येत नाही. वीज बिल मात्र वेळेवर आणि जास्त रकमेचे येत आहेत. सेवा द्यायला मात्र महावितरण तयार नाही.
अधिकार्यांकडे जबाबदारीची जाणीवच दिसत नाही. बैठका होतात, आश्वासने दिली जातात, पण प्रत्यक्षात जमिनीवर कोणताही बदल नाही. सध्या पावसाळा सुरू आहे. अशा परिस्थितीत हवेची एखादी झुळूक आली तरी तात्काळ वीज पुरवठा बंद होतो. परिणामी वीजेवर अवलंबून असलेले अनेक कामे ठप्प होत आहेत.वीज पुरवठा काहीवेळ चालू राहतो आणि लगेच बंद होतो. अशी परिस्थिती निर्माण झाली असताना अधिकारी व कर्मचार्यांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. महावितरणने तातडीने वेळापत्रक जाहीर करावे, कर्मचार्यांची संख्या वाढवावी आणि तक्रार निवारण व्यवस्था सुधारावी अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. महावितरणच्या या भोंगळ कारभाराने ग्राहक त्रस्त झाले आहेत.