एकीकडे सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असतानाच हिंगणघाट शहरात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली.
हिंगणघाट : एकीकडे सर्वत्र स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा होत असतानाच हिंगणघाट शहरात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहरावर शोककळा पसरली. बस स्थानक ते आंबेडकर शाळा रोडवर दुचाकीवरून ट्रिपल सीट येणाऱ्या तीन विद्यार्थिनींचा गाडीचा तोल गेल्याने त्या मुख्य रस्त्यावर पडल्या. त्याच वेळी मागून येणाऱ्या ट्रॅव्हल्स बसच्या मागील चाकाखाली त्या आल्याने तिन्ही विद्यार्थिनींचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी सुमारे 9:45 ते 10 वाजताच्या दरम्यान घडली.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंबेडकर शाळेत अकरावीच्या वर्गात शिकणारी मिसबा जावेद शेख (वय 17 वर्षे) ही आपल्या मैत्रिणी आरोही अनुप चौरे (वय 16 वर्षे, रा. स्वीपर कॉलनी) आणि समृद्धी रूपक ठामसे (वय 15 वर्षे) यांच्यासोबत दुचाकी क्रमांक एमएच 32 एडब्ल्यू 5779 वरून आंबेडकर चौकाकडून आंबेडकर शाळेकडे बस स्थानक मार्गाने जात होती.
साखरकर कॉम्प्लेक्सजवळ रस्त्यावर अचानक कुत्रा आडवा आल्याने दुचाकीचे संतुलन बिघडले आणि तिन्ही विद्यार्थिनी रस्त्यावर पडल्या. त्याच वेळी मागून हिंगणघाटहून नागपूरकडे जाणारी संगम ट्रॅव्हल्स बस क्रमांक एमएच 49 एटी 3438 तेथून जात होती. या बसच्या मागील चाकाखाली तिन्ही विद्यार्थिनी आल्याने हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिन्ही विद्यार्थिनींचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिन्ही विद्यार्थिनींचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. तसेच घटनास्थळी असलेली दुचाकी आणि ट्रॅव्हल्स बस पोलिसांनी तातडीने पोलीस ठाण्यात जमा केली.
अपघाताची वार्ता संपूर्ण शहरात आगीसारखी पसरली. त्यानंतर मृत विद्यार्थिनींचे नातेवाईक, आप्तेष्ट आणि नागरिकांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली. रुग्णालय परिसरातही पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.
मृत विद्यार्थिनींपैकी मिसबा आणि समृद्धी या आंबेडकर ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेतील अकरावीच्या विद्यार्थिनी होत्या. तर आरोही ही मोहता विद्यालयाची विद्यार्थिनी होती. तिन्ही विद्यार्थिनी मैत्रिणी असल्याने त्या एकत्र जात होत्या.
शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिन्ही मृत विद्यार्थिनींचे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
अपघाताची माहिती मिळताच हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट दिली. त्यांनी मृत विद्यार्थिनींच्या पालकांची आणि नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शहरात होणारा लोकार्पण कार्यक्रमही रद्द करण्यात आला.
वृत्तलेखनाच्या वेळेपर्यंत या घटनेप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.
या भीषण अपघातामुळे स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहावर विरजण पडले असून, संपूर्ण हिंगणघाट शहरावर शोककळा पसरली आहे.