मानोरा शहरातून मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक होत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्ता ओलांडताना नागरिकांमध्ये भिती!
मानोरा (Heavy Vehicles) : तालुक्याचे ठिकाण मानोरा शहरातून मोठ्या प्रमाणावर जड वाहनांची वाहतूक होत असल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्रक, ट्रॅक्टर, डंपर यासारख्या जड वाहनांमुळे गावातील मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होत असून पादचारी, विद्यार्थी आणि नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
गावातील रस्ते अरुंद असल्यामुळे जड वाहनांची सततची वर्दळ नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. शाळकरी मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे. तसेच धूळ, आवाज आणि अपघाताचा धोका यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गावातून होणारी ही जड वाहतूक थांबवून गावाबाहेरून बायपास रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी वारंवार करण्यात येत आहे. मात्र संबंधित प्रशासनाने याकडे अद्याप गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वडगाव येथून बायपास रस्त्याच्या मागणीसाठी माजी पंचायत समिती उप सभापती उज्ज्वला राजेंद्र गावंडे यांनी गत एक वर्षापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभाग यवतमाळ यांना पत्र दिले होते. परंतु, सा. बां. विभाग यांनी या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. या समस्येमुळे स्थानिक जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने दखल घेऊन बायपास रस्ता तयार करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. बायपास रस्ता झाल्यास गावातील वाहतूक सुरळीत होऊन अपघाताची शक्यता कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. शहराच्या बाहेरून बाय पास रस्ता तयार झाल्यास जड वाहनाची ये - जा करण्याची समस्या सुटण्यास मदत होईल. तसेच शहरातील वाहतूक सुरळीत होईल.