मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' (Missing Link) प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
बोगद्यात दरड कोसळल्याच्या घटनेनंतर प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्न
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील महत्त्वाकांक्षी 'मिसिंग लिंक' (Missing Link) प्रकल्पाच्या बोगद्यात दरड कोसळल्याच्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे नेते जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले होते. त्यांच्या टीकेला आता भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील अल्पकालीन चर्चेदरम्यान जयंत पाटील यांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या गुणवत्तेवर सरकारला धारेवर धरले. हजारो कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या 'मिसिंग लिंक' प्रकल्पात पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. या प्रकल्पाच्या नियोजनावेळी हवामान बदल आणि भौगोलिक जोखमींचा पुरेसा विचार करण्यात आला होता का, तसेच या प्रकल्पाचे 'क्लायमेट ऑडिट' का करण्यात आले नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गोपीचंद पडळकरांचा पलटवार
“ज्याला सांगली ईश्वरपूरचा रस्ता ४० वर्षात करायचं जमलं नाही तो चालला आहे कनेक्टिंग लिंकचा मुका घ्यायला. बारामती ते फलटण बरेच वर्ष रस्ता नव्हता. देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि तो हायवे तयार झाला. यांना गावातलं कळेना आणि हे निघाले कनेक्टिंग लिंकवर बोलायला.” अशा शब्दांत जयंत पाटील यांच्यावर गोपीचंद पडळकरांनी टीका केली.
'वीर शिंग्रोबा धनगर' नाव देण्याची मागणी
यावेळी गोपीचंद पडळकर यांनी मुंबई-पुणे मार्गाच्या इतिहासाचाही उल्लेख केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, 1853 मध्ये इंग्रजांनी मुंबई-पुणे रस्ता उभारण्यासाठी समिती नेमली होती. त्यावेळी एका धनगर मेंढपाळाने अधिकाऱ्यांना पुण्याचा मार्ग दाखवला. अधिकाऱ्याने त्याला बक्षीस म्हणून काय हवे, असे विचारले असता "भारत सोडून निघून जा," असे उत्तर त्याने दिले. त्यानंतर त्या इंग्रज अधिकाऱ्याने त्या मेंढपाळावर गोळ्या झाडल्याचा दावा पडळकर यांनी केला. त्या धनगराचे नाव वीर शिंग्रोबा धनगर असल्याचे सांगत, 'मिसिंग लिंक' प्रकल्पाला त्यांचे नाव देण्याची मागणीही त्यांनी केली.