Ghot-Regdi Route: घोट-रेगडी मार्गाच्या रुंदीकरणासाठी व त्याचे राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषणा करण्याची तीव्र मागणी नागरिकांकडून होत आहे. या मार्गामुळे दोन्ही राज्यांतील संपर्क सुधारेल.
चामोर्शी-घोट-रेगडी मार्गातून छत्तीसगडला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग जाहीर करा
घोट/चामोर्शी (Ghot-Regdi Route) : चामोर्शी तालुक्यातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेगडी गावातून छत्तीसगड राज्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग जाहीर करावा, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. चामोर्शी तालुका मुख्यालय नुकतेच राष्ट्रीय महामार्ग ३५३ ने जोडले गेले असले, तरी या मार्गाची पुढे छत्तीसगड राज्याशी थेट जोडणी करण्याची आवश्यकता नागरिकांनी अधोरेखित केली आहे. या मार्गामुळे दोन्ही राज्यांतील दळणवळण सुलभ होऊन व्यापार, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
सुमारे ३० वर्षांपूर्वी बीआरओ (Border Roads Organisation) मार्फत घोट–कसनसूर–जारावंडी–पेंढरी (Ghot-Regdi Route) पर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र सध्या कसनसूर–रेगडी–घोट मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्ता केवळ तात्पुरत्या डागडुजीवर सुरू आहे. विशेषतः रेगडी ते कसनसूर दरम्यान अनेक ठिकाणी रस्ता पूर्णपणे उखडला असून मुरूम टाकून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली आहे. रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत असून अपघातांची शक्यता वाढली आहे.
या (Ghot-Regdi Route) मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे, तीव्र वळणे आणि अरुंद पट्टा असल्याने वाहनचालकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. कसनसूर परिसरातील शेकडो गावांचा चामोर्शी तसेच चंद्रपूर जिल्हा मुख्यालयाशी संपर्क या मार्गावर अवलंबून आहे. त्यामुळे हा मार्ग नागरिकांच्या दैनंदिन जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. या पार्श्वभूमीवर, घोट–रेगडी–कसनसूर मार्गाचे तात्काळ रुंदीकरण करून त्यास राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा व छत्तीसगड राज्याशी थेट जोडणी करावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
छत्तीसगड–महाराष्ट्र सीमेवरील भागात मोठ्या प्रमाणात बंगाली भाषिक नागरिक वास्तव्यास आहेत. या नागरिकांमध्ये सतत परस्पर संपर्क राहून सामाजिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक संबंध दृढ झाले आहेत. “रोटी-बेटी”चे नाते निर्माण झाल्यामुळे दोन्ही राज्यांतील लोकांमध्ये आपुलकीचे बंध अधिक घट्ट झाले आहेत. परिणामी, या सीमावर्ती भागात नातेवाईकांची ये-जा तसेच व्यापार-व्यवहार सातत्याने सुरू असतो.