PM Gharkul Yojana: घरकुल योजनेअंतर्गत अनुदान हे पूर्ण घर बांधकामाचा खर्च नसून, केवळ आर्थिक मदत असल्याचे स्पष्टीकरण आले आहे. अधांतरी कामे आणि गैरसमज दूर करण्याची गरज.
अनुदानाच्या गैरसमजामुळे घरांची कामे अधांतरी
सेनगाव (PM Gharkul Yojana) : स्वतःच्या हक्काचे घर असावे, हे प्रत्येक सामान्य माणसाचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी शासनाच्या ‘पंतप्रधान आवास योजना’ व राज्य पुरस्कृत घरकुल योजनांद्वारे लाखो रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र, या योजनेचा उद्देश पूर्ण होण्याऐवजी अनेक ठिकाणी घरांची कामे अधांतरी राहात असल्याचे वास्तव समोर येत आहे. यामागे लाभार्थ्यांची चुकीची समजूत व अनुदानाचा होणारा दुरुपयोग हे प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट होत आहे.
शासनाकडून मिळणारे घरकुल अनुदान हे घर बांधणीसाठी ‘पूर्ण खर्च’ नसून केवळ ‘प्रोत्साहनपर आर्थिक मदत’ आहे. ही मूलभूत बाब अनेक लाभार्थ्यांच्या लक्षात येत नसल्याने “संपूर्ण खर्च सरकार करणार” या गैरसमजातून बांधकामे अर्धवट राहात आहेत. वाढत्या महागाईत केवळ अनुदानाच्या रकमेवर संपूर्ण घर उभारणे शक्य नसताना स्वतःचा आर्थिक व श्रमाचा वाटा देणे गरजेचे आहे. याशिवाय, मिळालेल्या अनुदानाचा योग्य वापर न होता तो इतर कारणांसाठी खर्च केला जात असल्याचेही अनेक प्रकरणांत दिसून येत आहे. घरगुती गरजा, लग्नकार्य, कर्जफेड किंवा व्यसनांवर खर्च केल्यामुळे प्रत्यक्ष बांधकामासाठी निधी अपुरा पडतो. काही ठिकाणी नियोजनाअभावी पाया भरणीतच संपूर्ण रक्कम खर्च होऊन पुढील बांधकाम थांबते.
दरम्यान, तज्ज्ञांच्या मते लाभार्थ्यांनी हप्त्यापूर्वीच बांधकामाचे नियोजन करणे, मिळालेला प्रत्येक रुपया केवळ घरासाठीच वापरणे आणि टप्प्याटप्प्याने काम पूर्ण करून पुढील हप्त्याची मागणी करणे गरजेचे आहे. “हे घर माझे आहे” ही भावना ठेवून जिद्दीने काम केल्यासच योजना यशस्वी ठरेल, असेही मत व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागात ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’ अंतर्गत साधारण १.५५ ते १.६५ लाख रुपयांपर्यंत एकूण मदत मिळते, तर नगरपंचायत व शहरी भागात ‘प्रधानमंत्री आवास योजना-शहरी’ अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना सुमारे २.५० लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. मात्र, या रकमेचा योग्य वापर आणि स्वतःची आर्थिक सहभागिता नसल्यास घरकुलाचे स्वप्न अपूर्णच राहणार, हे वास्तव आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासनानेही केवळ कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष बांधकामाच्या गुणवत्तेवर व निधीच्या वापरावर कडक लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.
प्रतिक्रिया
“घरकुल योजना ही शासनाची अत्यंत महत्वाची आणि जनकल्याणकारी योजना आहे. मात्र, या (PM Gharkul Yojana) योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान हे संपूर्ण घर बांधकामाचा खर्च नसून केवळ आर्थिक मदत आहे, हे सर्व सरपंच व लाभार्थ्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. शासनाने दिलेला निधी हा घरकुल उभारणीसाठी आधार म्हणून आहे. लाभार्थ्यांनी मिळालेल्या प्रत्येक रुपयाचा योग्य वापर करून स्वतःच्या श्रमाची व सहभागाची जोड दिली, तरच घराचे स्वप्न पूर्ण होईल. अन्यथा केवळ शासकीय अनुदानावर पूर्ण घर उभारणे शक्य नाही. त्यामुळे गैरसमज दूर करून नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे गरजेचे आहे.असे आढावा बैठकीत आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी स्पष्ट केले.
प्रशासकीय
अधिकाऱ्यांच्या मते, “घरकुलासाठी मिळणारा निधी हा केवळ आधार आहे. तो केवळ विटा-सिमेंटसाठी वापरून त्यात स्वतःच्या श्रमाची जोड दिल्यासच घराचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.” त्यामुळे लाभार्थ्यांच्या मानसिकतेत बदल होणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.