दसाईगंज तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या वर्षी २१ फेब्रुवारी रोजी मोठे राजकीय वादळ उठले होते.
कोरेगाव (Gadchiroli Politics) : दसाईगंज तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतीमध्ये गेल्या वर्षी २१ फेब्रुवारी रोजी मोठे राजकीय वादळ उठले होते. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी गोंड-गोवारी समाज अनुसूचित जमातीत मोडत नसल्याचे स्पष्ट करत पाच सदस्यांना अपात्र ठरवण्याचा आदेश दिला होता.
दरम्यान, कोरेगाव येथील जयपेरसा आदिवासी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी २० ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने संबंधित पाचही सदस्य अपात्र ठरल्याने ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
या पोटनिवडणुकीत ममता मनोहर आळे, खुशाल वैद्यनाथ आळे, सुधाकर दामा मडावी, अर्चना मिनेश मरस्कोल्हे आणि सीमा योगेश्वर आळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, विहित कालावधीत त्यांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याने पाचही उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे हा विषय सध्या चर्चेचा ठरला आहे.
तथापि, या निकालाची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.