लातूर येथील कॉइल नगर झोपडपट्टी भागातील अनेक वर्षांपासून शिधापत्रिकेपासून (रेशन कार्ड) वंचित असलेल्या पात्र कुटुंबांना अखेर त्यांचा हक्क मिळाला आहे.
लातूर (Food Security) : लातूर येथील कॉइल नगर झोपडपट्टी भागातील अनेक वर्षांपासून शिधापत्रिकेपासून (रेशन कार्ड) वंचित असलेल्या पात्र कुटुंबांना अखेर त्यांचा हक्क मिळाला आहे. राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या निर्देशानंतर सोमवारी या भागातील एकूण ९२ कुटुंबांना ‘अंत्योदय’ आणि ‘प्रथम प्राधान्य’ श्रेणीतील शिधापत्रिकांचे अधिकृत वाटप करण्यात आले.

दहा दिवसांपूर्वी अध्यक्ष महेश ढवळे यांनी लातूर येथील कॉइल नगर झोपडपट्टी भागाला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली होती. या भेटीदरम्यान अनेक वर्षांपासून अनेक गरीब आणि गरजू कुटुंबांकडे शिधापत्रिकाच नसल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. याची दखल घेत त्यांनी स्थानिक प्रशासनाला व शासनाला या पात्र कुटुंबांना तातडीने शिधापत्रिका उपलब्ध करून देण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या.
अध्यक्षांच्या सूचनेनुसार प्रशासकीय यंत्रणेने तातडीने हालचाली करत पात्र लाभार्थ्यांची शोधमोहीम व कागदपत्रांची पडताळणी पूर्ण केली. त्यानुसार सोमवारी आयोजित कार्यक्रमात एकूण ९२ पात्र कुटुंबांना शिधापत्रिका सुपूर्द करण्यात आल्या. यामध्ये अतिशय गरीब आणि वंचित कुटुंबांचा ‘अंत्योदय अन्न योजना’ शिधापत्रिकेत समावेश करण्यात आला आहे. इतर पात्र कुटुंबांना ‘प्रथम प्राधान्य कुटुंब’ योजनेच्या शिधापत्रिका देण्यात आल्या आहेत.

अध्यक्षांसमवेत शिधापत्रिका वाटप करताना प्रेरणा शितोळे (पुरवठा निरीक्षक), आशा जटाळे (पुरवठा सहाय्यक), नवनाथ मद्दे उर्फ मद्देमामा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व भारतीय किसान संघाचे सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील, राहुल भुतडा, इस्माईल शेख, महेंद्र पतंगे आदी उपस्थित होते.
अनेक वर्षांची प्रतीक्षा संपून हक्काचे रेशन कार्ड मिळाल्यामुळे कॉइल नगर झोपडपट्टी भागातील नागरिकांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या तत्पर कारवाईबद्दल येथील रहिवाशांनी राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे आणि प्रशासनाचे जाहीर आभार मानले आहेत.
“एकही गरीब कुटुंब अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही!”
“१० दिवसांपूर्वी जेव्हा मी कॉइल नगरला भेट दिली, तेव्हा येथील नागरिकांची अडचण समजली. शासनाला तातडीने शिधापत्रिका देण्याच्या सूचना केल्या होत्या. आज अवघ्या १० दिवसांत या ९२ कुटुंबांच्या हाती रेशन कार्ड सोपवताना मनापासून आनंद होत आहे. एकही गरीब कुटुंब अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही, यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.”
— महेश ढवळे, अध्यक्ष, राज्य अन्न आयोग