पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दिग्रस बु. गटग्रामपंचायत कार्यालयाला सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली.
पातूर पोलिसांत तक्रार दाखल; सखोल चौकशीची ग्रामस्थांची मागणी
पातूर : पातूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दिग्रस बु. गटग्रामपंचायत कार्यालयाला सोमवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अचानक भीषण आग लागली. या आगीत कार्यालयातील अत्यंत महत्त्वाचे शासकीय दस्तावेज व कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, आग लागली त्यादरम्यान कार्यालयातील लाखो रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी सरपंच (प्रशासक) व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयातून धूर व आगीच्या ज्वाला निघत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत आग विझवण्याचा शर्थीचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीत ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे दस्तावेज, दप्तर तसेच भारतीय राष्ट्रीय ध्वजाचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
४ ते ५ एलईडी टीव्हीसह ६० ते ६५ विद्युत दिवे चोरीला?
आगीच्या या घटनेसोबतच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील सुमारे ४ ते ५ एलईडी टीव्ही, विद्युत खांबावर लावण्यासाठी आणलेले अंदाजे ६० ते ६५ एलईडी दिवे तसेच इतर महत्त्वाचे साहित्य, असा एकूण ५ ते ६ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. आगीच्या आडून हा चोरीचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळजनक चर्चा सुरू आहे.
पोलिसांकडून पंचनामा; ग्रामस्थांमध्ये संताप
घटनेची माहिती मिळताच मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला. मात्र, वृत्त लिहिपर्यंत पंचनाम्याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नव्हती. दरम्यान, या संपूर्ण घटनेची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दाद
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, घटनेची तक्रार देण्यासाठी काही नागरिक पातूर पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, त्यांची स्वतंत्र लेखी तक्रार तातडीने स्वीकारण्यात आली नसल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. या प्रकारानंतर काही स्थानिक युवकांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आणून दिले व या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली.