जिल्ह्यातील वारंगा फाटा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाविरोधात संताप; दोन तास वाहतूक ठप्प
हिंगोली : जिल्ह्यातील वारंगा फाटा येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. DAP खताचा तुटवडा, बियाण्यांची हमी नसणे, ट्रॅक्टरसाठी डिझेल उपलब्ध न होणे, कालव्याला पाणी नसणे, बँकेत कॅश टंचाई, गॅस टंचाई, शेतीमालाला भाव नसणे तसेच तरुणांना रोजगार उपलब्ध होत नसल्याच्या मुद्द्यांवर शेतकरी व नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
आज सकाळपासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे वारंगा फाटा परिसरातील वाहतूक सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये काही वेळ खडाजंगीही झाली. मागण्यांबाबत ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले.
आंदोलनकर्त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ DAP खत व बियाणे पुरवावे, पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरसाठी डिझेल उपलब्ध करून द्यावे, हक्काचा पीक विमा तातडीने द्यावा, हळदीसह सर्व शेतीमालाला हमीभाव द्यावा, बँकांमध्ये पुरेशी कॅश उपलब्ध करावी, कालव्यात पाणी सोडावे, बेरोजगारांसाठी रोजगारनिर्मिती करावी तसेच गॅस टंचाई दूर करावी, अशा मागण्या शासनाकडे केल्या.
क्रांतिकारी शेतकरी संघटना च्या पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला की, या रास्ता रोको आंदोलनामुळे शासनाला जाग येऊन शेतकऱ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा आहे. मात्र शासनाने तात्काळ भूमिका न घेतल्यास महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. तरीही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिले.
या आंदोलनात संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, सेनगाव तालुका अध्यक्ष प्रवीण मते, कळमनुरी तालुका अध्यक्ष चैतन्य चव्हाण, राम चव्हाण, रमेश जाधव, गजानन काळे, शांतीराम सावके, ज्ञानेश्वर बोंढारे, सुभाषराव गाडगे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, युवक व नागरिक सहभागी झाले होते.