तालुक्यातील धनगरवाडी येथे बुधवारी (ता. १५) एका शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
सेनगाव (Farmer Suicide) : तालुक्यातील धनगरवाडी येथे बुधवारी (ता. १५) एका शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. गौरख बबन पातळे (वय २५ वर्षे, रा. धनगरवाडी) असे मृत शेतकर्याचे नाव आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे एक वाजताच्या सुमारास पातळे यांनी शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. घटनेनंतर सायंकाळी सात वाजेपर्यंत मृतदेह खाली उतरवण्यात आलेला नव्हता. यामुळे घटनास्थळी काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे तसेच सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव देशमुख यांच्यासह ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.
गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झळके, पोलीस उपनिरीक्षक राठोड, नितेश नेलगुळे यांच्यासह सुमारे २० पोलीस कर्मचारी व होमगार्ड ताफ्यासह उपस्थित होते. पोलिसांकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यात आली. दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांनी रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर प्रकरणाशी संबंधित कथित अनियमिततेबाबत दोषींवर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच पोलिसांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला असून, या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. गेल्या काही महिन्यांपासून धनगरवाडी परिसरात सिंचन विहिरींच्या मंजुरी व अनुदान वितरणा संदर्भात कथित अनियमिततेबाबत तक्रारी समोर आल्या आहेत. काही शेतकर्यांच्या नावे विहिरी मंजूर होऊन कागदोपत्री अनुदान काढण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रत्यक्ष लाभ न मिळालेल्या शेतकर्यांनाच जबाबदार धरण्यात येत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
सदर आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून सर्व बाबींची तपासणी सुरू आहे. याबाबत अधिकृत माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. दरम्यान, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. दरम्यान ही आत्महत्येची घटना दुपारी १ वाजता उघडकीस आली. आत्महत्येस जबाबदार असणार्यांवर गुन्हे दाखल केल्या शिवाय मृतदेह खाली उतरवला जाणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला. त्यामुळे रात्री ८ वाजेपर्यंत झाडावरून मृतदेह खाली उतरविण्यात आला नव्हता. या ठिकाणी गोरेगाव पोलिसांचे पथकही दाखल झाले होते.