वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.
परिवर्तन शेतकरी संघटनेचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन
मानोरा : वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. खुल्या बाजारातून सोयाबीन खरेदी करून ते कंपनीच्या नावाने बॅगमध्ये भरून बियाणे म्हणून विक्री केल्याने हजारो शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी परिवर्तन शेतकरी संघटनेचे नेते मनोहर राठोड यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांना निवेदन देत संबंधित कंपन्यांवर कठोर कारवाई करण्यासह शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, मानोरा तालुक्यातील सुमारे ३० टक्के शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या आहेत. शेतकऱ्यांनी कृषी केंद्रातून "पांढऱ्या फुलांचे" सोयाबीन बियाणे खरेदी केले होते. मात्र, या बियाण्यांना अंकुरच फुटला नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. यासाठी संबंधित सोयाबीन कंपन्यांना जबाबदार धरावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

निवेदनानुसार, सन २०२५ मध्ये वाशिम व कारंजा बाजारातून विविध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी केले होते. त्यामध्ये आरव्हीएसएम ११३५ या वाणासाठी ६,००० ते ७,५०० रुपये प्रति क्विंटल, विहार बायोटेक यांनी ७,५०० ते ९,२०० रुपये, रवी सिड्स यांनी ६,००० ते ७,५०९ रुपये, विस्तारा कंपनीने ५,५०० ते ६,५०० रुपये, तर ३३५ वाणासाठी ४,८०० ते ५,२०० रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी करून ते बियाणे म्हणून कंपनीच्या नावाने विक्री केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या बोगस बियाण्यांमुळे शेतात उगवण न झाल्याने शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागत असून बियाणे, मशागत आणि मजुरीचा दुहेरी खर्च सहन करावा लागत आहे. तसेच "पांढऱ्या फुलांचे" हजारो क्विंटल सोयाबीन कंपन्यांनी कसे तयार केले आणि किती शेतकऱ्यांना फाऊंडेशन बियाणे दिले, याचीही सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
परिवर्तन शेतकरी संघटनेने बोगस बियाण्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांवर तातडीने फौजदारी कारवाई करावी, दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर आर्थिक मदत जाहीर करावी आणि जिल्ह्यातील बियाणे विक्रीवर कडक नियंत्रण ठेवून विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी केली आहे.
वाशिम हा आकांक्षित जिल्हा असतानाही शेतकऱ्यांना सातत्याने नैसर्गिक तसेच आता मानवनिर्मित संकटांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित सोयाबीन कंपन्यांविरुद्ध कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेने कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.