नवी मुंबईतील ऐरोली परिसरात जवळपास ११ महिन्यांपूर्वी घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा रबाळे एमआयडीसी पोलिसांनी उलगडा केला आहे.
ऐरोलीतील धक्कादायक प्रकरण; कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारे पोलिसांनी उघड केला गुन्हा, न्यायालयाकडून सात दिवसांची पोलीस कोठडी
नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली परिसरात जवळपास ११ महिन्यांपूर्वी घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा रबाळे एमआयडीसी पोलिसांनी उलगडा केला आहे. अनैतिक संबंधांत पती अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीने तिच्या रिक्षाचालक प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचा आरोप आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे तीन तुकडे करून जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी फेकल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात पोलिसांनी पत्नी सुनिता कुशवाहा आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती यांना अटक केली असून, न्यायालयाने दोघांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव बळीराम सूर्यनाथ कुशवाह असे आहे.
प्रेमसंबंधांत अडथळा ठरत असल्याचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, सुनिता कुशवाहा हिचे रिक्षाचालक राहुल प्रजापती याच्यासोबत प्रेमसंबंध होते. पती बळीराम हा या संबंधांत अडथळा ठरत असल्याने दोघांनी त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.
९ ऑगस्ट २०२५ रोजी रात्री सुनिताने मुलांना नातेवाईकांकडे पाठवले. त्यानंतर बळीराम गाढ झोपेत असताना आरोपींनी त्याचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरल्याचा आरोप तपासात समोर आला आहे.
मृतदेहाचे तीन तुकडे करून जंगलात फेकल्याचा आरोप
गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे तीन तुकडे केले. त्यानंतर ते पोत्यात भरून राहुल प्रजापतीच्या ऑटो रिक्षामधून गवळीदेव डोंगर परिसरातील जंगलात नेण्यात आले आणि वेगवेगळ्या ठिकाणी टाकण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनेनंतर सुनिताने तिचे वडिलोपार्जित घर भाड्याने दिले आणि मुलांसह नवी मुंबईतील घणसोली येथे राहण्यास गेल्याची माहिती तपासात समोर आली आहे.
बेपत्ता तक्रारीनंतर वाढला संशय
घटना घडल्यानंतर अनेक महिने हा प्रकार उघडकीस आला नव्हता. मात्र, बळीरामचा भाऊ वारंवार त्याच्या बेपत्ता होण्याबाबत विचारणा करत असताना सुनिता टाळाटाळ करत असल्याने संशय बळावला. त्यानंतर बळीरामच्या भावाने पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
सीडीआरच्या आधारे पोलिसांनी केला उलगडा
पोलिसांपासून बचाव करण्यासाठी दोन्ही आरोपींनी वारंवार सिम कार्ड बदलल्याचा तपासात खुलासा झाला. मात्र, पोलिसांनी कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि इतर तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींमधील संपर्क उघड केला.
यानंतर दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आरोपींच्या कबुलीजबाबानंतर गवळीदेव डोंगर परिसरातून मृतदेहाचे काही अवशेष जप्त करण्यात आले असून उर्वरित अवशेषांचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.