मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
'बोल बोल राणी'च्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत सईच्या सुरुवातीच्या प्रवासापासून आजच्या यशस्वी कारकिर्दीपर्यंत सुबोध भावेंनी व्यक्त केलं स्पष्ट मत
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सई ताम्हणकरने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्येही ठसा उमटवणाऱ्या सईच्या प्रवासाबाबत अभिनेता सुबोध भावे यांनी नुकत्याच एका मुलाखतीत मनमोकळेपणाने भाष्य केले. सईच्या सुरुवातीच्या काळात तिच्याबाबत काही शंका वाटत होती, मात्र 'दुनियादारी'नंतर तिच्यात मोठा सकारात्मक बदल झाल्याचे त्यांनी सांगितले.
सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर यांचा 'बोल बोल राणी' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तिघांनी 'कलाकृती मीडिया'ला दिलेल्या मुलाखतीत अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी सईच्या करिअरमधील बदलांवर बोलताना सुबोध भावे यांनी तिच्या अभिनयातील प्रगल्भतेचे विशेष कौतुक केले.
सुबोध भावे म्हणाले की, सई जेव्हा सांगलीहून मुंबईत अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी आली होती, तेव्हा ती अगदी नवखी होती. त्या काळात त्यांनी एकत्र दोन-तीन प्रोजेक्ट्सवर काम केले होते. त्यापैकी एका चित्रपटाची केवळ गाणी चित्रित झाली आणि तो प्रकल्प बंद पडला. तसेच 'सनई चौघडे' या चित्रपटातही दोघांनी एकत्र काम केले होते.
चिन्मय मांडलेकरबाबत सुरुवातीपासूनच तो उत्कृष्ट अभिनेता असल्याची खात्री होती, कारण 'वादळवाट' मालिकेत त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव होता, असेही सुबोध यांनी सांगितले. मात्र सईबाबत त्यावेळी ती इंडस्ट्रीत किती काळ टिकेल, याविषयी मनात साशंकता होती. तिचा अभिनय चांगला असला तरी त्या काळात तिचा आवश्यक तितका फोकस जाणवत नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना सुबोध भावे यांनी सांगितले की, 'दुनियादारी' चित्रपटानंतर सईच्या व्यक्तिमत्त्वात आणि काम करण्याच्या दृष्टिकोनात मोठा बदल झाला. त्या चित्रपटानंतर ती अधिक केंद्रित, जाणीवपूर्वक आणि सूज्ञपणे भूमिका निवडू लागली. याचा अर्थ यापूर्वी ती वाईट काम करत होती असा नाही, तर आता ती अधिक विचारपूर्वक आणि परिपक्वतेने काम करत असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या योगदानाचाही उल्लेख करत सुबोध भावे म्हणाले की, ज्या पद्धतीने रंजना, जयश्री गडकर आणि अलका कुबल यांनी त्यांच्या काळावर अधिराज्य गाजवले, त्याचप्रमाणे पुढील काही वर्षांनी या काळाचा उल्लेख झाला, तर मुक्ता बर्वे आणि सई ताम्हणकर यांनी हा काळ गाजवला, असे निश्चितपणे म्हटले जाईल.