राज्यातील Gen Z वर्गाला रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकारने व्यापक कृती आराखडा तयार केला आहे.
कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समितीची बैठक; रोजगार मेळाव्यांपूर्वी दोन आठवड्यांचे पूर्व-प्रशिक्षण, प्रत्येक जिल्हा-तालुक्यात पोहोचणार उपक्रम
मुंबई : राज्यातील Gen Z वर्गाला रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकारने व्यापक कृती आराखडा तयार केला आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या माध्यमातून 31 मार्च 2027 पर्यंत राज्यभर 1 हजार रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार असून, या उपक्रमाची माहिती जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचे निर्देश कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले आहेत.
या संदर्भात मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय रोजगार मेळावा समितीची बैठक पार पडली. बैठकीला राज्यस्तरीय रोजगार मेळाव्याचे अध्यक्ष डॉ. रणजित पाटील, सदस्य डॉ. सरोजिनी राऊत, रविंद्र देशपांडे, विशाल टिब्रेवाल, जयेश ढाके, राहुल खोले, तसेच सदस्य सचिव आणि कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाचे आयुक्त डॉ. अमित सैनी यांच्यासह शासकीय सदस्य उपस्थित होते.
बैठकीत रोजगार मेळावे अधिक परिणामकारक कसे ठरतील, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. केवळ नोकरी देणारे कार्यक्रम म्हणून नव्हे, तर कौशल्य विकास आणि रोजगारक्षमतेत वाढ करणारे व्यासपीठ म्हणून या मेळाव्यांची उभारणी करण्यावर भर देण्यात आला.
सरकारने आयटीआय व्यतिरिक्त इतर महाविद्यालयांतील विद्यार्थी, अपस्किलिंगची गरज असलेले उमेदवार तसेच विविध सामाजिक संस्थांशी समन्वय साधून रोजगार मेळाव्यांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकाधिक Gen Z पर्यंत या उपक्रमाचा लाभ पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात रोजगार मेळाव्यांची माहिती पोहोचवण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे. स्थानिक प्रशासन, संबंधित विभाग आणि प्रदेश समन्वय समिती यांच्या माध्यमातून इच्छुक उमेदवारांपर्यंत रोजगाराच्या संधींची माहिती पोहोचवली जाईल.
रोजगाराबरोबरच स्वयंरोजगाराच्या संधींबाबतही मार्गदर्शन करण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी तज्ज्ञ व्यक्ती आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समुपदेशन आयोजित केले जाणार असून, रोजगाराबरोबर उद्योजकतेबाबतही जागरूकता निर्माण केली जाणार आहे.
रोजगार मेळाव्यापूर्वी उमेदवारांना अधिक सक्षम करण्यासाठी दोन आठवड्यांच्या पूर्व-रोजगार प्रशिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. या प्रशिक्षणाचा उद्देश मुलाखतीसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करणे आणि रोजगार मिळण्याची शक्यता वाढवणे हा आहे.
प्रशिक्षणाच्या पहिल्या आठवड्यात व्यक्तिमत्त्व विकास, शिष्टाचार (Etiquettes), प्रभावी बायोडाटा (Resume) तयार करणे आणि संभाषण कौशल्यांवर विशेष भर दिला जाईल. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या अॅप्टिट्यूड टेस्टनुसार इलेक्ट्रिसिटी, प्लंबिंग, रिसेप्शनिस्ट आणि मार्केटिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाईल.
सरकारचा उद्देश केवळ रोजगार मेळावे आयोजित करण्यापुरता मर्यादित नसून, उमेदवारांना उद्योगांच्या गरजेनुसार तयार करून त्यांची रोजगारक्षमता वाढवण्याचा आहे. योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन मिळाल्यास रोजगार मेळाव्यांमधील निवडीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे.
या उपक्रमाचे नियोजन आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी आणि प्रदेश समन्वय समिती यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या. तसेच रोजगार मेळावे, प्रशिक्षण आणि जनजागृती मोहिमेचा नियमित आढावा घेण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला.