शेतातून लोखंडी औत घेऊन घरी जात असताना औताच्या दांडीचा रस्त्यावरील लोंबकळलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
सेलू तालुक्यातील म्हाळसापूर येथील घटना; लोंबकळलेल्या वीजतारेमुळे दुर्घटना
परभणी (Electric Shock) : सेलू तालुक्यातील म्हाळसापूर येथे शेतातून लोखंडी औत घेऊन घरी जात असताना औताच्या दांडीचा रस्त्यावरील लोंबकळलेल्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (५ जून) दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाळसापूर येथील आसाराम भीमराव आवटे (वय ३५) हे आपल्या शेतातून लोखंडी औत घेऊन घराकडे परतत होते. त्यांचे शेत म्हाळसापूर-पाथरी मार्गालगत आहे. दरम्यान, रस्त्यावर लोंबकळत असलेल्या विजेच्या तारेला औताच्या लोखंडी दांडीचा स्पर्श झाला. त्यामुळे विद्युत प्रवाह औतामध्ये उतरल्याने आसाराम आवटे यांना जोरदार विजेचा धक्का बसला.
घटनेची माहिती मिळताच संबंधित रोहित्रावरील वीजपुरवठा तातडीने खंडित करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने आवटे यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
सायंकाळी सुमारे ६ वाजता देऊळगाव गात प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय लोया यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर म्हाळसापूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या प्रकरणी मयताचे भाऊ पांडुरंग भीमराव आवटे यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मृत आसाराम आवटे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि चार मुली असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे म्हाळसापूरसह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गुलाब राठोड करीत आहेत.