पुण्यातील वडकी परिसरात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.
वडकीतील मोडक इंटरनॅशनल स्कूलची बस अपघातग्रस्त; लोखंडी कठड्यामुळे वाचले विद्यार्थ्यांचे प्राण, चालकावर गुन्हा दाखल
पुणे (Drunk Bus Driver) : पुण्यातील वडकी परिसरात शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मद्याच्या नशेत असलेल्या स्कूलबस चालकामुळे जवळपास 50 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला. सुदैवाने बस विहिरीत कोसळण्यापूर्वी लोखंडी कठड्याला धडकून थांबली आणि मोठी दुर्घटना टळली.
मोडक इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना घेऊन संबंधित बस शाळेकडे जात होती. बसमध्ये सुमारे 50 विद्यार्थी प्रवास करत होते. वडकीच्या दिशेने जात असताना चालकाने मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्याने बसवरील त्याचे नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्याबाहेर जाऊन थेट बाजूला असलेल्या पाण्याने भरलेल्या विहिरीच्या दिशेने गेली.
विहिरीलगत उभारण्यात आलेल्या लोखंडी सळ्यांच्या कठड्याला बस जोरात धडकली. या कठड्यामुळेच बस पुढे जाण्यापासून थांबली. काही फुटांचे अंतर राहिले असताना बस थांबल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा बस थेट विहिरीत कोसळण्याची भीती होती.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बसमधील विद्यार्थी घाबरून गेले. बस थांबताच मुलांनी आरडाओरडा सुरू केला. विद्यार्थ्यांचा आक्रोश ऐकून परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत चालकाला ताब्यात घेतले.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, चालक इतका मद्यधुंद होता की त्याला व्यवस्थित उभेही राहता येत नव्हते. यामुळे संतप्त नागरिकांनी त्याला चोप दिला आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.
दरम्यान, नागरिकांनी तत्परता दाखवत सर्व विद्यार्थ्यांना बसमधून सुरक्षित बाहेर काढले. या अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याला दुखापत झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर नागरिकांनी चालकाला पोलिसांच्या ताब्यात दिले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी संताप व्यक्त करत शाळा प्रशासनाकडे स्पष्टीकरण मागितले. तसेच संबंधित चालकावर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली.
या घटनेनंतर चालकाला निलंबित करण्यात आले असून हडपसर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार बुधवारी दुपारी सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास घडला.