तो दिव्यांग... वय असेल २२ ते २४ वर्षे... बोलताही येत नाही अन् लिहिताही येत नाही... दिव्यांग असल्याने त्याला चालताही येत नाही...
शहरातील रस्त्यावर मागतोय भीक
दिलीप रामटेके
नागपूर (Disabled Rights) : तो दिव्यांग... वय असेल २२ ते २४ वर्षे... बोलताही येत नाही अन् लिहिताही येत नाही... दिव्यांग असल्याने त्याला चालताही येत नाही... कायमस्वरूपी रोजगार नसल्याने तो रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह करतोय. तो इशारा करूनच सांगतोय, मला भीक नको, शासनाकडून रोजगार मिळवून द्या...!
वर्तमानात समाजामध्ये दिव्यांग व्यक्तींना योग्य सुविधा, संधी आणि आधार देण्यासाठी शासनातर्फे अनेक योजना राबविल्या जातात. ज्यांना शारीरिक, मानसिक किंवा इतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे जीवनाच्या अनेक पैलूंमध्ये अडचणी येतात. दोन दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास तो विद्यापीठ ग्रंथालय मार्गावर वाहनचालकांना भीक मागताना दिसून आला. त्याच्याजवळ एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये क्युआर कोडची कॉपी होती. कोणी त्याला जी पे करून पैसे देत होते, तर कोणी रोख स्वरूपात पाच अथवा दहा रुपये देत होते. त्याची स्त्यिा' दिव्यांग युवकाला मदतीची अपेक्षाथती पाहून वाहनचालक स्वतः थांबून त्याला मदत करीत होते. त्याला बोलता येत नसल्यामुळे तो आपल्या भावना व्यक्त करू शकत नव्हता. हाताने इशारे करून तो आपल्या मनातील आपल्या भावना सांगण्याचा प्रयत्न करीत होता.
यावेळी देशोन्नतीने त्याला बोलते केले असता आपली व्यथा हाताच्या इशाऱ्याने मांडली. मला भीक नको, माझ्या कुवतीनुसार मला सरकारकडून रोजगार मागून द्या, अशी आर्त हाक इशाऱ्यातून देत होता.
सायंकाळ झाली की तो कुठे जातो, कोणासोबत राहतो. त्याला आई-वडील, बहीण-भाऊ आहेत का, याची माहिती मिळाली नाही. गेल्या दोन ते तीन दिवसापासून येथील रस्त्याने फिरत आहे एवढीच माहिती मिळाली. शहरातील अनेक भागात, मुख्य चौकावर तो भीक मागत असल्याचेही कळले. दिव्यांगांसाठी शासन विविध योजना व उपक्रम राबवत असताना त्याचा लाभ त्याला का मिळू नये, हा प्रश्न मात्र मनाला भेडसावून गेला. त्याला लिहिता, बोलता, वाचता येत नाही म्हणून संधी मिळत नसावी का, असा प्रश्न उपस्थित झाला.
दिव्यांगांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात
दिव्यांग व्यक्तींना कुणीही त्याच्या क्षमतेनुसार कार्य करण्याची संधी देत नाही. परिणामी त्यांना उदरनिर्वासाठी भीक मागावी लागते. अशी वेळ दिव्यांग व्यक्तीवर येऊ नये, यासाठी सरकार आणि सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. अशा दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान सुधारण्यासाठी त्यांच्या कुवतीनुसार व क्षमतेनुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा, ज्यामुळे ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकेल!