खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल व पेट्रोल मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.
प्रशासनाचे लेखी आश्वासन; शेतकऱ्यांना तीन दिवसांत मुबलक इंधन पुरवठा करण्याचे पत्र
चिखली (Diesel Shortage) : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल व पेट्रोल मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. अनेक पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांना कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर माजी सरपंच संतोष भुतेकर व सरपंच सचिन कदम यांनी २५ मे २०२६ रोजी मेरा फाट्यावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.
या आंदोलनाची प्रशासनाने गंभीर दखल घेत रविवारी (दि. २४ मे) रात्री सुमारे १० वाजता आंदोलनकर्त्या शेतकरी नेत्यांना तहसील कार्यालयात चर्चेसाठी बोलावण्यात आले. यावेळी तहसीलदार सौरभ गावंडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड तसेच अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार रुपेश शक्करगे उपस्थित होते. प्रशासन, महसूल विभाग व पोलिस अधिकाऱ्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.
चर्चेनंतर चिखली तहसीलदार कार्यालयाच्या वतीने नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांनी लेखी पत्र देत पुढील तीन दिवसांत तालुक्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात डिझेल व पेट्रोल उपलब्ध करून देण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन दिले.
तहसील प्रशासनाने दिलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, खरीप हंगामाच्या पूर्वमशागतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल अत्यावश्यक असून प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच चिखली तालुक्यातील सर्व पेट्रोल-डिझेल पंपांना शेतीकामासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्याने इंधन देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने पुढे असेही स्पष्ट केले की, पेट्रोल पंपांवर नियमित पुरवठा वाढविण्यात आला असून वाहनधारकांना सुरळीतपणे पेट्रोल व डिझेल उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. डिझेल वितरणात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक पेट्रोल पंपावर पोलिस व महसूल कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यासोबतच, कॅनमध्ये डिझेल नाकारल्यास किंवा शेतकऱ्यांना त्रास दिल्यास संबंधित पेट्रोल पंप चालकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.
प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेनंतर व लेखी आश्वासनानंतर २५ मे रोजी मेरा फाट्यावर होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा संतोष भुतेकर, सचिन कदम व विनायक सरनाईक यांनी केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रशासनाने तत्काळ निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.