गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यभरात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा थेट परिणाम हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळद व्यापारावर झाला आहे.
वाहतुकीवर परिणाम; शेतकऱ्यांना हळद विक्रीसाठी न आणण्याचे आवाहन
हिंगोली (Diesel Shortage) : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यभरात निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा थेट परिणाम हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील हळद व्यापारावर झाला आहे. लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी डिझेल उपलब्ध होत नसल्याने संत नामदेव हळद मार्केट २५ मे, सोमवारपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोमवारपासून हळद विक्रीसाठी आणू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
सध्या हिंगोलीच्या संत नामदेव मार्केटमध्ये हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा आणि विदर्भातील शेतकरी हळद विक्रीसाठी येथे येतात. दररोज शेकडो वाहनांतून हळदीची आवक होत असून बाजार समितीचा मोंढा गजबजलेला असतो. मात्र मागील आठवडाभरापासून डिझेलचा तुटवडा जाणवू लागला आहे. सुरुवातीला वाहनचालकांना टाक्यांमधून व कॅनमधून डिझेल दिले जात होते. परंतु जिल्हा प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव त्यावर निर्बंध घातले आहेत. आता प्रत्येक वाहनचालकाला थेट पेट्रोल पंपावर वाहन नेऊनच डिझेल भरावे लागत आहे.
अनेक पेट्रोल पंपांवर डिझेलचा साठा संपल्याने वाहनचालकांना डिझेलसाठी एक-दोन दिवस तळ ठोकून थांबावे लागत आहे. हळद ही नाशवंत नसली तरी लांब पल्ल्याच्या बाजारपेठेत, विशेषतः सांगली, ईरोड, निजामाबाद येथे वेळेत पोहोचवणे आवश्यक असते. डिझेलअभावी वाहतूक ठप्प झाल्याने व्यापारी आणि वाहनचालक दोघेही मोठ्या अडचणीत सापडले आहेत. माल वेळेत पोहोचला नाही तर सौदे रद्द होण्याची व नुकसान होण्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
या पार्श्वभूमीवर हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. डिझेल टंचाईची गंभीर परिस्थिती आणि वाहतुकीतील अडथळे लक्षात घेऊन समितीने २५ मेपासून हळद लिलाव व खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. डिझेलचा पुरवठा सुरळीत झाल्यानंतर व वाहतूक पूर्वपदावर आल्यानंतर बाजार पुन्हा सुरू करण्याबाबत स्वतंत्रपणे कळवण्यात येईल, असे सचिवांनी स्पष्ट केले.
दरम्यान, ऐन हंगामात मोंढा बंद झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अनेक शेतकऱ्यांनी हळद काढून विक्रीसाठी तयार ठेवली आहे. बाजार समितीने शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले असून तोपर्यंत हळद साठवून ठेवावी व विनाकारण वाहतूक खर्च करू नये, असे कळवले आहे. डिझेल टंचाई लवकर दूर व्हावी, अशी मागणी व्यापारी व शेतकरी वर्गातून होत आहे.