राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी राज्यातील राजकीय वातावरण तापले.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याच्या चर्चांनी राज्यातील राजकीय वातावरण तापले असताना खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका स्पष्ट केली. पक्षाने एनडीएमध्ये जाण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नसून, माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना अधिकृत आधार नसल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री तथा आमदार जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर या चर्चांना आणखी वेग आला होता. मात्र, या घडामोडींशी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अधिकृत भूमिकेचा संबंध नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.
त्या म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून पक्ष सत्तेत सहभागी होणार असल्याच्या विविध बातम्या प्रसारित होत आहेत. मात्र, पक्षातील कोणत्याही वरिष्ठ नेत्याने याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. माध्यमांमध्ये ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्या सूत्रांच्या हवाल्याने असून, पक्षाकडून कोणतेही अधिकृत निवेदन देण्यात आलेले नाही.
या संदर्भात आपण संजय राऊत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि बंटी पाटील यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करून पक्षाची भूमिका स्पष्ट केल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात एनडीएमध्ये सहभागी होण्याबाबत कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले.
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर प्रस्ताव आल्यास 24 तासांत भूमिका
आगामी पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकार संसदेत मांडू शकणाऱ्या मतदारसंघ पुनर्रचना (Delimitation) विधेयकाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष पाठिंबा देणार असल्याच्या चर्चांनाही सुप्रिया सुळे यांनी फेटाळून लावले. या विधेयकासंदर्भात पक्षाकडे अद्याप कोणताही नवा प्रस्ताव आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.
त्या म्हणाल्या की, प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्याचा सखोल अभ्यास केला जाईल आणि 24 तासांच्या आत पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर केली जाईल. सध्या कोणताही प्रस्ताव नसताना भूमिका जाहीर करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला आरक्षण विधेयक आणि पूर्वीची बैठक
महिला आरक्षण विधेयकाचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, हे विधेयक आधीच मंजूर झाले असून त्याबाबत कोणतीही शंका नाही. त्यांनी सांगितले की, यापूर्वी किरण रिजिजू यांनी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, एआयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी आणि त्यांना दिल्ली येथे चर्चेसाठी बोलावले होते. त्या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित होते.
या बैठकीत मतदारसंघ पुनर्रचना प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती. काश्मीर ते कन्याकुमारी देशभर एकसमान नियम लागू राहतील आणि कोणावरही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यावेळी देण्यात आल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
गैरसमज टाळण्यासाठी पत्रकार परिषद
सकाळपासून काही वृत्तपत्रे आणि प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष मतदारसंघ पुनर्रचना घटनादुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. या वृत्तांमुळे पक्ष महायुतीसोबत जाणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते.
मात्र, या सर्व वृत्तांमध्ये तथ्य नसल्याचे सांगताना सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, पक्षाने या विषयावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. या पार्श्वभूमीवर शरद पवार, जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच पक्षाचे आमदार आणि खासदार यांच्याशी चर्चा केल्यानंतरच आपण पत्रकार परिषद घेतली. महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये, हा त्यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.