Dapura Water Scarcity: दापुरा खु.मध्ये जल जीवन मिशन अंतर्गत खोदलेली विहीर कोरडी पडली असून, ग्रामपंचायतीची भरपूर पाणी असलेली विहीर योग्य वापरात नसल्याने नागरिकांच्या पाण्याची समस्या वाढत आहे.
दापुरा खु. येथे मानवनिर्मित पाणी टंचाई!
मानोरा (Dapura Water Scarcity) : तालुक्यातील दापुरा खु. येथील नागरिक मानवनिर्मित पाणी टंचाईला सामोरे जात आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत लाखो रुपये खर्च करून खोदलेली विहीर पूर्णपणे कोरडी पडली असून, दुसरीकडे (Dapura Water Scarcity) ग्रामपंचायतीच्या मालकीची विहीर भरपूर पाण्याने भरलेली आहे. मात्र, प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे वॉर्ड क्र. १ प्लॉट वरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, असे तक्रार निवेदन नागरिकांनी गटविकास अधिकारी यांना दि. ४ मे रोजी दिले आहे.
नागरिकांनी दिलेल्या विनंती अर्जात म्हटले आहे की, शासनाने ग्रामीण भागात पाणी टंचाई होऊ नये म्हणून जल जीवन मिशन अंतर्गत विहिरीचे खोदकाम करून नळ योजना राबवली. दापुरा खु. येथेही लाखो रुपये खर्च करून विहीर खोदून पाईप लाईन करण्यात आली. परंतु सदर विहीर पूर्णपणे कोरडी आहे. दुसरीकडे (Dapura Water Scarcity) ग्रामपंचायतीच्या मालकीच्या विहिरीत आजही भरपूर पाणी आहे. या विहिरीवरून पाणी पुरवठा केल्यास वॉर्ड क्र. १ व गावातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ निकाली निघू शकतो. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे गावातील महिला वर्ग मजुरीचे काम सोडून १ ते २ कि.मी. अंतरावरून ४३ ते ४४ अंश सेल्सिअसच्या तापमानात पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.
यामुळे उत्पन्नावर परिणाम होत असून महिलांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तातडीने ग्रामपंचायतीच्या विहिरीवरून पाणी पुरवठा सुरू करावा, भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये याकरीता म्हसणी येथील धरणावरून कायमस्वरूपी (Dapura Water Scarcity) पाणी पुरवठा करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी. अन्यथा आंदोलन छेडण्याच्या इशाऱ्यावर निवेदन महीला व नागरिकांनी गट विकास अधिकारी यांना दिले आहे. निवेदनावर सुमित्रा चतुरकर, रेखा घोडमारे, उज्वला दांडेकर, सावित्री इंगोले आदीसह शेकडो महीला व पुरुषांच्या स्वाक्षऱ्या आहेत.